मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली Pudhari
जळगाव

Jalgaon Bypass News | बायपासच्या निकृष्ट कामाचा फटका; सहा जळगावकरांचा मृत्यू, वारसांना सहा लाखांची भरपाई देण्याची मागणी

शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊन आतापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Paldhi Tarsod Bypass Compensation To Victims

जळगाव : पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे ओव्हर ब्रिज अवघ्या काही महिन्यांत खचल्याने अवजड वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली. त्यानंतर शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होऊन आतापर्यंत सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मृतांच्या वारसांना प्रत्येकी सहा लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी मृत नागरिकांच्या नातेवाईकांसह जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. बायपासच्या कामाचा दर्जा आणि अपघातांची परिस्थिती गंभीर असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

महायुती सरकारच्या काळात कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या बायपासच्या कामाच्या दर्जाबाबत सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. खासदार स्मिता वाघ यांनीही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, संबंधित यंत्रणांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३१ जुलै रोजी रेल्वे ओव्हर ब्रिजचा भाग खचल्याने बायपासवरील वाहतूक शहरात वळवण्यात आली. त्यानंतर वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले. दिल्लीहून आलेल्या तांत्रिक पथकाने पुलाची पाहणी केली असून, संबंधित प्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, तपासाची गती आणि जबाबदार कंत्राटदारावरील कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सत्ताधाऱ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर विरोधक काय कामाचे?

प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे शहरातील मंगला अर्जुन माळी (वय ५५, पिंप्राळा), प्रेमराज शिवराम चौधरी, योगेश ऊर्फ युवराज कडू महाजन (इच्छादेवी परिसर), अनिरुद्ध सुरेश डहाके आणि शांताराम केशव पाटील (रावेर) या नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. एका बाजूला भाजप नगरसेवक संतप्त होऊन रस्त्यावर उतरावे लागत आहे, तर दुसरीकडे मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भरपाईची मागणी केली आहे. 'प्रशासन सत्ताधाऱ्यांचेही ऐकत नसेल, तर नक्की ऐकते कोणाचे?' असा संतप्त सवाल आता जळगावातील नागरिक विचारत आहेत.

रस्त्यांची दुरवस्था ही नागरिकांच्या जीविताच्या अधिकाराशी संबंधित असल्याचे विविध न्यायालयीन निकालांत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मृतांच्या वारसांना प्रत्येकी किमान सहा लाखांची भरपाई द्यावी, तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त, आरटीओ आणि एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची संयुक्त चौकशी समिती स्थापन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहरात आणखी जीवितहानी होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT