जळगावः अयोध्या–प्रयागराज महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदतकार्य सुरू केले होते. या सर्व सुरक्षित भाविकांना स्वतंत्र रिझर्वेशन बोगीद्वारे परतीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला. आज सर्व भाविक लखनऊ ते एल टी टी, गाडी क्रमांक 01016 द्वारे जळगाव रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले. यावेळी सर्व भाविकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तात्काळ मदतीच्या सूचनांनुसार हे मदतकार्य युद्धपातळीवर आणि जलदगतीने पूर्ण करण्यात आले. जिल्हा प्रशासन, सुलतानपूर प्रशासन, लखनऊ व भुसावळ रेल्वे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या समन्वयातून भाविकांसाठी निवास, भोजन, उपचार आणि सुरक्षित परतीची सर्व व्यवस्था करण्यात आल्या. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी संपूर्ण मदतकार्य यशस्वी केले.
अपघातात पिंप्राळा (जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे जळगावला तात्काळ आणण्याची व्यवस्था करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एकूण परत आलेल्या ४३ भाविकांमध्ये दोन धुळे, एक नाशिक, एक पुणे येथील असून उर्वरित सर्व धरणगाव, एरंडोल, पाचोरा, भुसावळ, यावल, पारोळा आणि वरणगाव या जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणचे आहेत.
जळगाव स्टेशनवर पोहोचताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी सर्व भाविकांचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार धरणगाव महेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच भाविकांचे नातेवाईक उपस्थित होते. प्रशासन सर्व भाविकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सतत त्यांच्या संपर्कात आहेत. सर्व भाविक आज सायंकाळी 6.30 वाजता जळगावात सुखरूप दाखल झाले. भाविकांनी प्रशासनाने केलेल्या जलद मदत कार्य व प्रतिसादाबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. रेल्वे स्टेशन वरून सर्व भाविक आपल्या नातेवाईकांसमवेत निवासस्थानाकडे रवाना झाले.