जळगाव, पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अकलूज ते दुधखेडा या रस्त्याचे काम मंजूर आहे. तरीही बांधकाम विभाग व ठेकेदार तीन वर्षांपासून वेळकाढूपणा करत आहे. हा रस्ता लवकरात लवकर व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आज (दि.२७) ४ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अकलूज ते दुधखेडा या रस्त्याच्या कामासाठी दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या मार्गावरील २० गावांच्या नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील, तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांच्या सरपंच व ग्रामस्थांच्या उपस्थितीत यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे. एस. तडवी व बांधकाम अभियंता अजित निंबाळकर यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी तडवी यांनी आंदोलनकर्त्यांना एक महिन्याच्या आत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे लेखी पत्र दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, आदिवासी विभागाचे एम. बी. तडवी, वसंत पाटील, यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी, मोहसीन खान, आबिद कच्छी, माजी नगरसेवक हाजी अकबर खाटीक, बापू जासुद, समाधान पाटील, अन्वर खाटिक, कामराज घारू, ललित पाटील, हाजी युसुफ शेख, दुसखेडा परिसरातील कासवा गावांचे सरपंच राहुल इंगळे, सदस्य श्रीराम सपकाळे, दुसखेडाचे उपसरपंच विवेक सोनवणे, महेन्द्र बाऱ्हे, याकुब तडवी, विनोद पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा