Jalgaon Monsoon Deficit
जळगाव : सप्टेंबर महिना संपत आला तरी जळगाव जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. महसूल प्रशासनाने १८ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सरासरी १२३.६ मिमी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात ५२.२ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात केवळ ४२.२ टक्के पाऊस झाला आहे. चाळीसगाव, बोदवड आणि यावल तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे, काही मोजक्या मंडळांनी सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविला आहे.
१८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. मात्र, बहुतांश ठिकाणी पाऊस शिडकाव्यापुरताच मर्यादित राहिला. शुक्रवारी जिल्ह्यात सरासरी ३.९ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये भडगाव तालुक्यात सर्वाधिक २७ मिमी, पारोळा तालुक्यात ११.२ मिमी आणि एरंडोल तालुक्यात ८.८ मिमी पाऊस झाला.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, चाळीसगाव तालुक्यात सरासरी १६९.७ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ २०.१ मिमी म्हणजे ११.८ टक्के पाऊस झाला आहे. बोदवडमध्ये ४०.७ मिमी (२५.९ टक्के), तर यावलमध्ये ३४.६ मिमी (३० टक्के) पाऊस नोंदविण्यात आला. मुक्ताईनगरमध्ये ३८.८ मिमी (३३.२ टक्के), तर रावेरमध्ये ५०.३ मिमी (३७.७ टक्के) पाऊस झाला आहे.
याउलट, धरणगाव तालुक्यात ९४.४ मिमी (६३.७ टक्के), तर जळगाव तालुक्यात ७८.९ मिमी (७३.२ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भाग पावसाच्या प्रतीक्षेत असताना काही मंडळांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक मंडळात १३०.१ मिमी म्हणजे ११५.१ टक्के पाऊस झाला. जळगाव तालुक्यातील पिंप्राळा मंडळात ११५ मिमी (१०६.७ टक्के), तर पारोळा मंडळात १२२.७ मिमी (१००.३ टक्के) पाऊस नोंदविण्यात आला.
धरणगाव मंडळात १२०.१ मिमी (८१ टक्के), तर जामनेर तालुक्यातील तोंडापूर मंडळात ९७ मिमी (७५.८ टक्के) पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा आणि भूजलपातळी टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित पावसाळी दिवसांत दमदार पावसाची आवश्यकता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती आणि पाणी उपलब्धतेबाबत चिंता वाढली असून, शेतकरी समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.