Jalgaon MLC Election Sixteen Candidates Nomination
जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांबरोबरच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोर भूमिका घेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.
निवडणुकीसाठी एकूण ६१ इच्छुकांनी ९१ अर्ज संच घेतले होते. त्यापैकी अंतिम दिवशी १६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. या निवडणुकीत ६३० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रारंभी ही लढत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात सरळ होईल, असे चित्र होते. मात्र, शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेशमा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे भुसावळ येथील नगरसेवक सचिन चौधरी यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने राजकीय समीकरणांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
याशिवाय शिवसेना (शिंदे गट)चे पदाधिकारी दीपक धांडे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवारांपुढे बंडखोरांचे आव्हान कितपत प्रभावी ठरणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
अर्ज दाखल केलेले उमेदवार
नंदकिशोर महाजन – भाजप (महायुतीचे अधिकृत उमेदवार)
शरद तायडे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार)
निलेश सुरेश चौधरी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (अतिरिक्त अर्ज)
रेशमा कुंदन काळे – शिवसेना (शिंदे गट), नगरसेविका (बंडखोर अपक्ष)
दीपक धांडे – शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी (बंडखोर अपक्ष)
अनिल चौधरी – प्रहार जनशक्ती पक्ष (अपक्ष)
सचिन संतोष चौधरी – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), नगरसेवक (बंडखोर अपक्ष)
आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद (अपक्ष)
प्रवीण गंगाराम पाटील (अपक्ष)
सुनील जंगले (अपक्ष)
निलेश गणेश झोपे (अपक्ष)
कलीम खान हैदर खान मनियार (अपक्ष)
जितेंद्र रमेश देशमुख (अपक्ष)
घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील (अपक्ष)
शेख दानिश शेख निसार (अपक्ष)
जावेद इक्बाल अब्दुल रशीद (अपक्ष)
दरम्यान, अर्ज छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असून बंडखोर उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.