Jalgaon Collector Office protest
जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना कार्यालय परिसरात आंदोलन करण्यास मज्जाव केला जातो, तर दुसरीकडे महसूल विभागातील कर्मचारी त्याच ठिकाणी ठाण मांडून घोषणाबाजी करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
जुनी पेन्शन योजना, अनुकंपा तत्त्वावरील भरती आणि वाहनचालकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महसूलसह विविध विभागातील कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून ‘काम बंद’ आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी Ayush Prasad यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कोणत्याही आंदोलनास बंदी घालून आंदोलकांसाठी ‘जीएस ग्राऊंड’ निश्चित केले होते.
मात्र सध्या जिल्हाधिकारी Rohan Ghughe यांच्या कार्यकाळात हा नियम शिथिल झाल्याचे दिसून येत आहे. महसूल कर्मचारी कार्यालयाच्या हिरवळीवर बसून आंदोलन करत असताना प्रशासन व पोलीस यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना प्रवेशद्वारावरच अडवले जाते. त्याचवेळी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मात्र कार्यालयाच्या आवारात सुरू असल्याने “नियम फक्त सामान्यांसाठीच का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांमध्ये याबाबत नाराजी व्यक्त होत असून, आंदोलन करायचे असल्यास सर्वसामान्यांना शहराबाहेरील ‘जीएस ग्राऊंड’वर पाठवले जाते, तर शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालय परिसरात मोकळीक दिली जाते, ही दुहेरी भूमिका असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे प्रशासनाच्या या भूमिकेबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय अनिल वाघ यांनी सांगितले की, कर्मचारी त्यांच्या कार्यालयाच्या आवारात शांततेत आणि मर्यादित वेळेत आंदोलन करत असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, याच निकषांचा वापर सर्वांसाठी समान का केला जात नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.