Jalgaon Heavy Rain Disrupts Railways
जळगाव : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे भुसावळ व जळगाव मार्गावर धावणाऱ्या सात महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या २४ व २५ जुलै रोजी तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
ऐन पावसाळ्यात गाड्या रद्द झाल्याने कामानिमित्त प्रवास करणारे चाकरमानी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, रेल्वे स्थानकांवरही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
गाडी क्र. ०९०५० भुसावळ – दादर विशेष (भुसावळ येथून)
गाडी क्र. २०९२५ सूरत – अमरावती एक्सप्रेस (सूरत येथून)
गाडी क्र. १९१०५ उधना – भुसावळ एक्सप्रेस (उधना येथून)
गाडी क्र. १९१०६ भुसावळ – उधना एक्सप्रेस (भुसावळ येथून)
गाडी क्र. २०९२६ अमरावती – सूरत एक्सप्रेस (अमरावती येथून)
गाडी क्र. ०९०५१ दादर – भुसावळ विशेष (दादर येथून)
गाडी क्र. ०९०५२ भुसावळ – दादर विशेष (भुसावळ येथून)
प्रवासासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा हेल्पलाइनद्वारे तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.