जळगाव; पुढारी वृत्तसेवा : खानदेशातील सर्व जागा ह्या भाजपाच्या होत्या. त्या आज नाही, तर गेल्या २५ वर्षापासून भाजपाकडेच होत्या. मात्र आज असे काय झाले की, जळगाव जिल्हा सोडल्यास भाजपाला यश आले नाही. त्यांच्यावर विचार करण्याची वेळ आली असून पूर्वीची संघटना राहिलेली दिसत नाही. त्यामुळे मला भाजपात प्रवेश करण्याची घाई नाही, अशी प्रतिक्रिया बुधवारी (दि.५) एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, नगरपासून दिडोरी, धुळे या सर्व जागावर २५ ते ३० वर्षापासून भाजपाचाच उमेदवार निवडणूक यायचा. या ६ जागा पैकी ५ जागा तरी भाजपा जिंकायचीच, मात्र या वेळेस फक्त जळगाव जिल्ह्याने लाज राखली आहे. यामागील कारणे काय आहेत, अपयशाची कारणे कोणती? पूर्वीपासून येणाऱ्या यशाला तडा का गेला. संघटनेमध्ये काय बदल झाले. पूर्वीची संघटनेची संघटनात्मक स्थिती काय होती, आताची संघटनात्मक स्थिती काय आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, यांचे चितंन त्यांनी करायला हवे. असे म्हणत मला आता तरी भाजपात प्रवेश करण्याची घाई नाही, असे खडसेंनी स्पष्ट केले.
हेही वाचा :