जळगाव : ग्रामीण मतदारसंघातील वाघनगर, माऊलीनगर आणि परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ स्थानिक महिलांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली काव्यरत्नावली चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चादरम्यान महिलांनी विविध घोषणाबाजी करत पालकमंत्री यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच मतदारसंघातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, वाघनगर आणि माऊलीनगर भागात दर पंधरा दिवसांनी केवळ अर्धा तास पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यापूर्वीही विविध स्वरूपाची आंदोलने करून प्रशासनाला निवेदने देण्यात आली होती.
मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन तातडीने नियमित व पुरेसा पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.