जळगाव : रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र हद्दीत शेरीनाका येथे नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या विना परवाना म्हशींची वाहतुक करणाऱ्या ४ वाहनांसह ३३ म्हशी असा एकूण ६४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मंगळवारी (दि.१५) रोजी विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्याने रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते ,तसेच सहा.पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह (फैजपुर) व पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या पाल दुरक्षेत्र येथील शेरीनाका येथे पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील, जगदीश लिलाधर पाटील, ईश्वर जुलालसिंग चव्हाण, हमीद हमजान तडवी ड्युटीवर होते.
बुधवारी (दि.१६) रोजी रात्री १.३० वाजेताच्या सुमारास आयशर वाहन क्रमांक (एम एच-१७ बी.झेड-७४५५) आणि वाहन क्रमांक (एमएच.१८ बी.जी. ८९३६), वाहन (एमएच १८ बी.जी.३८२३) वाहन क्रमांक (एमपी.०९ डी.जी-६६४४) ही वाहने थांबवून वाहनात काय आहे, असे विचारले असता चालकांनी वाहनात म्हशी आहेत, असे सांगितले. प्रत्येक वाहनातील म्हशीं अत्यंत निर्दर्यतेने दोरीने घट्ट बांधून ठेवलेल्या आहेत हे पोलिसांच्या निदर्शनास आले.
वाहनातील चालक इरफान खान, हिरु खान मेवाती वय-३१ रा.सारपाटा ता. अमळनेर, इनायत खान, काल्या खान वय-४० रा.बनखड ता. कसरावद जिल्हा खरगोन (मध्यप्रदेश),राजु खाँ ,सलीम खाँ वय-४० रा. ताजपुर ता.जि.उज्जैन (मध्यप्रदेश), ,अली खान ,शरीफ खान वय-३६ रा. पालसमद ता. कसरावद जि. खरगोन (मध्यप्रदेश), यांच्याकडे यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे म्हशी खरेदी केल्याबाबतचा कोणताही पुरावा नव्हता. या व्यक्ती बेकायदेशीररित्या म्हैशींची वाहतूक करत आहेत हे पोलिसांच्या निदर्शनास आले.याबाबात त्यांच्याविरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४ वाहनासह ३३ म्हशी असा एकूण ६४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पाल दुरक्षेत्र येथील पोलिस उपनिरिक्षक तुषार पाटील, जगदीश लिलाधर पाटील, ईश्वर जुलालसिंग चव्हाण,हमीद हमजान तडवी यांनी ही कारवाई केलेली असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक जगदिश पाटील करीत आहेत.