धुळे, पुढारी वृत्तसेवा : नागपूर-सुरत महामार्गावर व्यापाऱ्यावर हल्ला करून रोकड पळवल्याची घटना गुरुवारी (दि.18) घडली होती. या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले आहे. या टोळीकडून 6 लाख 84 हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी तसेच शेतमाल विक्री करून आलेले पैसे शेतकऱ्यांनी असुरक्षितपणे ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
नागपूर-सुरत महामार्गावर फागणे गावापाशी गुरुवारी (दि.18) किशोर पंढरीनाथ पाटील आणि अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे सोयाबीन विक्री करून 10 लाख 91 हजाराची रोकड घेवून येत होते. एमएच 19 बीइ 1807 या दुचाकीच्या डिक्की मध्ये ठेवून धरणगावाकडे जात होते. यावेळी दोन तरुण दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले. यातील एकाने तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले, असे कारण सांगून धमकवण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या तरुणांनी या व्यापाऱ्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर गाडीमधील रोकड घेऊन संबंधित तरुण पसार झाले. या संदर्भात त्यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करून तक्रार दिली.
यानंतर पोलिसांनी तपास करुन संशयित यश विश्वनाथ ब्रम्हे (रा. पवननगर, चाळीसगावरोड) ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्याने या गुन्हयाची कबुली दिली. हा गुन्हा राहुल अनिल नवगिरे (पवननगर, चाळीसगावरोड), चंद्रकांत रविंद्र मरसाळे (रा. मनोहर टॉकीजच्या मागे,), कल्पेश शाम वाघ (रा. पवन नगर हुडको, चाळीसगावरोड), राहुल शाम वाघ,( रा. पवन नगर ,हुडको), सनी संजय वाडेकर, (रा. मनोहर टॉकीजच्या मागे) यांचेसह कट रचून केल्याची माहिती उघड झाली.