Pune Nashik Agitation Support
धुळे : पुणे आणि नाशिक येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध न्याय्य मागण्यांसाठी धुळे शहरातील जेलरोड येथे आदिवासी क्रांती सेना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. सरकार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे उदासीनतेने पाहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
प्रशासनाला मागण्यांबाबत वारंवार इशारा देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. आदिवासी क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण भागवत पवार, राज्य सहसचिव सुनील आधार ठाकरे, अनिल आनंदा सोनवणे आणि संजय मोरे हे गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.
दरम्यान, कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी प्रवीण दाजमल वाघ, जयश्री प्रवीण वाघ, मोहन पवार आणि भीमराव मोरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या लढ्याची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत व कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी द्यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूंची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी करण्यात आली.
याशिवाय सेंट्रल किचन पद्धत बंद करून संबंधित शासन निर्णय रद्द करावा, २०११ चे धोरण सुधारणांसह लागू करावे, तसेच आश्रमशाळांमध्ये २४ तास डॉक्टर व आरोग्य कर्मचारी, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छ पाणी, दर्जेदार अन्न आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.