Dhule Irrigation Issuse
धुळे : धुळे ग्रामीण भागातील सिंचन क्षेत्र वाढवून शेतीला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून गिरणा धरणाचे आवर्तन थेट धुळे तालुक्यातील गावांसाठी सोडण्यात आले आहे. सोमवारी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हे पाणी आवर्तन सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार राम भदाणे यांनी दिली.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती विद्याधर पाटील, खोरदडचे माजी उपसरपंच शरद धनराज पाटील, मोरदडचे सरपंच गोविंदा पाटील तसेच नवल पाटील, योगेश पाटील, अशोक पाटील, प्रमोद पाटील, मयूर पाटील, प्रशांत पाटील, विनायक पाटील आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. या आवर्तनाचा लाभ मोरदड, खोरदड, विंचूर आदी भागांतील शिवाराला होणार असून ऐन उन्ह्याळ्यात शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला आहे.
आमदार राम भदाणे यांनी सांगितले की, धुळे ग्रामीण भागातील सिंचनक्षेत्र वाढवून बारमाही बागायतीला चालना देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गिरणा धरणाचे आवर्तन मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पुढील काळात गिरणा तसेच तापी नदीचे पाणीही आरक्षित करून अधिक व्यापक सिंचन व्यवस्था उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हा विषय सातत्याने मांडण्यात आला असून हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधीद्वारे याकडे लक्ष वेधण्यात आले होते. गिरणाचे पाणी शिवारात पोहोचल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून या निर्णयाचे स्वागत होत आहे.