Dhule government employees strike
धुळे : राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांच्या बेमुदत संपाच्या चौथ्या दिवशी धुळे येथील कल्याण भवन येथे घंटानाद आंदोलन करत संपकरी कर्मचाऱ्यांनी सरकारचे व जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचे उद्घाटन ८१ वर्षीय माजी पदाधिकारी हसमुख शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित कर्मचारी व शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. संपाचा चौथा दिवस उजाडूनही मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेऊन चर्चेसाठी पुढे येत नसल्याने संपकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या.
समन्वय समितीचे निमंत्रक डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, बेमुदत संपाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने कर्मचारी व शिक्षक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत. यामुळे वैद्यकीय सेवा, प्रशासकीय यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली असून यास शासनच जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करून वाटाघाटी करत नाहीत तोपर्यंत संप आणखी तीव्र होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, २७ एप्रिल रोजी सर्व कर्मचारी आपापल्या कार्यालयांसमोर तसेच शाळा व महाविद्यालयांसमोर निदर्शने करून सकाळी ११ वाजता कल्याण भवन, धुळे येथे एकत्र येऊन ‘थाळीनाद’ आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष राजेन्द्र माळी, सरचिटणीस दिपक पाटील ,कार्याध्यक्ष सुरेश पाईकराव,सचिव अविनाश मोरे, न्यायालयाचे सुधीर पोतदार ,महिला कर्मचारी संघटनेच्या श्रीमती प्रतिभा घोडके,पल्लवी शर्मा, सोनल कौजलगी, किशोरी अहिरे हरणे, श्रीमती शैलजा चव्हाण, स्वाती वाघ,वन विभागाचे भुषण पाटील ,सुधीर खैरनार, महसूलचे योगेश जिरे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रविण राजपूत, संजय निकुंभे, तलाठी संघटनेचे निलेश पाटील, , आदींनी मनोगत व्यक्त केले.