Court File Photo
धुळे

Dhule Police: ३,९०४ किलो गांजा जप्त, तरीही आरोपी सुटला!  पोलिसांचा ‘तो’ एक पराक्रम महागात? न्यायालयाच्या निकालाने झटका

सदोष तपासाचा आधार घेत न्यायालयाने सुमारे 3 हजार 900 किलो गांजाची साठवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Dhule Police

धुळे: अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदींचे पालन केले गेले नाही. विशेष म्हणजे गुन्ह्यातील पंचनाम्यावर जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसणे तसेच पंच म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचाच वापर करणे, असे तांत्रिक मुद्दे बचाव पक्षाचे विधीज्ञ मोहन भंडारी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याबरोबर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे 58 दाखले यांचा आधार बचाव पक्षाने घेतला. त्यामुळे या सदोष तपासाचा आधार घेत न्यायालयाने सुमारे 3 हजार 900 किलो गांजाची साठवणूक केल्याच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.

धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी न्यायालयात पाठवलेल्या खटल्यात या गुन्ह्याची माहिती दिली आहे. यात शिरपूर तालुक्यातील लाकडया हनुमान गावात मांगीलाल बारकू पावरा याच्या शेतात बांधकाम सुरु असलेल्या घराच्या बाजूला चा-याच्या पेंडयाखाली मानवी मेंदूवर विपरित परिणाम करणारा गांजा मादक पदार्थाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक केली आहे, अशा माहितीच्या आधारे 16 जून 2020 रोजी छापा कारवाईसाठी पोलीस पथक लाकडया हनुमान गावाकडे रवाना झाले. लाकडया हनुमान गावाच्या कच्च्या रोडने मांगीलाल पावरा याच्या शेतावर पोलिस पथक पोहोचले. त्यावेळी पोलिसांना पाहुन मांगीलाल पावरा हा पळत सुटला. त्यानंतर पोलिसांनी शेताची बारकाईने पाहणी केली असता चा-याच्या कडब्याच्या ढिगारेखाली काळया रंगाच्या प्लॅस्टीकच्या कागदाखाली गोण्यांमध्ये व पत्रटी गोठयांमध्ये हिरवट रंगाच्या पानबिया काडयांचा चुरा असलेला अर्धवट सुकलेला गांजा दिसून आला. यावेळी एकूण १२८ गोण्यांमध्ये ३९०४ किलो गांजा मिळून आला.

जप्ती पंचनामा सहा.पो.नि. उमेश शामराव बोरसे, यांनी केला. छापा टाकतेवेळी पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पो. अधिक्षक राजू भुजबळ हे हजर होते. त्याबाबत त्यांचे छापा टाकते वेळीचे हजर असल्याचे फोटो देखील तपास कामात तपास अधिकारी यांनी दोषारोपपत्रासोबत दाखल केले. तसेच या गुन्ह्याचा तपास सहा. पो. नि. अभिषेक दिलीप पाटील यांनी व पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी केला.

या खटल्याचे कामकाज सत्र न्यायाधीश एस एस भिष्मा यांच्या समोर चालले. यात सरकारी पक्षाच्या वतीने गुन्ह्यातील पंच, तपास अधिकारी आणि अन्य महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षाच्या वतीने अॅड. मोहन भंडारी यांनी सदोष तपासाचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला. यात कारवाई करताना तत्कालीन पोलीस अधीक्षक, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी उपस्थित होते. मात्र त्यांची कोठेही स्वाक्षरी घेण्यात आली नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा सापडलेला असताना अंमली पदार्थ प्रतिबंधक अधिनियमांच्या तरतुदींचे पालन करणे आवश्यक असताना महत्त्वाच्या तरतुदींचे पालन केले गेले नाही, ही बाब देखील न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या गुन्ह्यातील पंच म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा वापर केला गेला, ही बाब योग्य नसल्याचे मत देखील बचाव पक्षाने न्यायालयात मांडले. याबरोबरच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील 58 न्याय निवाडे न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे सदोष तपासाचा आधार मिळाल्याने सुमारे ३ हजार ९०० किलो गांजा बाळगल्या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.

या खटल्यात बचाव पक्षाच्या वतीने अॅड. मोहन भंडारी यांना अॅड. चैतन्य भंडारी, चार्मिश भंडारी, अॅड. प्राजक्ता राणा , अॅड. पूजा प्रजापत, अॅड. प्रशांत वाघ यांनी सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT