धुळे

Dhule news | शिंदखेडा तालुक्यातील 85 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी

पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील एकूण १२३ ग्रामपंचायतीपैकी ८५ गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ८५ गावे पाणीपुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. असे आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली आज शिंदखेडा येथे तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील पाणी टंचाई निवारण्यासाठी 85 गावे पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

शिंदखेडा तालुक्यातील पाणी टंचाई बाबत आज शिंदखेडा येथील बिजासन मंगल कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी तहसीलदार नितीन देवरे, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, उपनगराध्यक्ष उदय देसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महावीर सिंह रावल, डी.आर. पाटील, जिजाबराव सोनवणे, पंकज कदम आदी उपस्थित होते.

पालकमंत्री रावल म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यातील एकूण १२३ ग्रामपंचायतीपैकी ८५ गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ८५ गावे पाणीपुरवठा योजना महत्वपूर्ण आहे. ही योजना एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पुढील वर्षी मे अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत. या योजनेअंतर्गत या सर्व गावांमध्ये जलकुंभ उभारण्यात येणार असून, प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्वतः लक्ष देत कामाचा नियमित पाठपुरावा करावा, असेही आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले.

आगामी काळात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. जूननंतरही पुरेसा पाऊस न झाल्यास अधिग्रहण कालावधी वाढवण्याची तयारी ठेवावी. नवीन घुसरे, सुराय, विखरण, पाटण आणि वाडी या गावांमध्ये तातडीने पाणी पुरवठाबाबत उपाययोजना कराव्यात.

कृषी विभागाने खरीप हंगामात कमी पावसात येणाऱ्या वाणाबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असेही पालकमंत्री रावल यांनी सांगितले. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आतापर्यंत 27 गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या 2 गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT