धुळे : शिरपूर तालुक्यातील आंबे पाडा येथील विषबाधा झालेल्या महिला आणि दोघां मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संदर्भात आता शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा घातपात आहे की सामूहिक आत्महत्या याविषयी तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान मयत विवाहितेच्या पतीची देखील कसून चौकशी केली जाते आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील आंबे पाडा शिवारातील शेतात भारती संजय पावरा तसेच चिराग (वय 3) आणि रियाज (वय 5) या तिघांना विषबाधा झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे त्यांना अत्यावस्थ अवस्थेत तातडीने शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान भारती पावरा आणि चिराग या दोघांचा मृत्यू झाला.
या घटनेतील रियाज पावरा याला तातडीने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा देखील उपचार घेत असताना आज मृत्यू झाला आहे. या घटने संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर या गंभीर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सुरू केला आहे.
मयत विवाहिता आणि तिच्या दोन्ही चिमूरड्यांना विषबाधा कशामुळे झाली, ही बाब आता तपासून पहिली जाते आहे. विशेष म्हणजे हा घातपात आहे की सामूहिक आत्महत्या या दृष्टीने देखील तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. तर आंबेपाडा शिवारात पोलिसांनी संबंधितांचे जवाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच मयत विवाहितेचा पती आणि तिच्या सासरच्या नातेवाईकांचे देखील जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे . यातून खरा प्रकार बाहेर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.