Farm power supply issues Dhule
धुळे: मागील पंधरा वर्षांपूर्वी विजेचा प्रश्न गहन झालेला होता. शेती विजेचा प्रश्न तर भयंकर झालेला होता. ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर महिना महिना मिळत नव्हता. पण आज ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात बसतो. येत्या चार वर्षांत गावांसह शेती विजेचा प्रश्न पुर्णतः निकाली काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास आमदार राम भदाणे यांनी व्यक्त केला.
धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे गावठाण व कृषी फिडर स्वतंत्र करण्याचा उध्दाटन सोहळा झाला. आमदार भदाणे यांच्या हस्ते उध्दाटन झाले. यावेळी म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे, बापू दगा साबळे, संस्थाध्यक्ष ललित आहिरे, उडाणेचे माजी उपसरपंच राजू मोरे, नेर मंडळाध्यक्ष छोटू साळुंखे, किशोर शिंदे, भुरा दादा, माजी उपसरपंच भमन शिंदे, नानाभाऊ वाघ, श्यामराव अमृतसागर, भरत नवसारे, प्रमोद शिंपी, माजी सरपंच विठोबा मास्तर, नानाभाऊ नवसारे , सहाय्यक अभियंता चव्हाण, कनिष्ठ अभियंता हेमंत ठाकूर, ज्ञानेश्वर महाले, नंदू साबळे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार भदाणे म्हणाले, शेती आणि गावासाठी एकाच फिडरवरून विजेचा पुरवठा व्हायचा. यामुळे ग्रामस्थांसह शेतकर्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होते. कुसुंबा, नांद्रे, चौगाव, सांजोरी, कावठी, अंचाळे, अकलाड व हेंद्रुणचे फिडर सेपरेशन झाले आहे. येत्या काही दिवसांत गोताणे, अजनाळे, कुंडाणे (वार) आदी गावांचेही फिडर सेपरेशन होईल.
शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक आहे. तो जगाचा पोशिंदा आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. धुळे ग्रामीणमध्ये शेतीसाठी येत्या चार वर्षात दिवसाच वीज देण्याचे उद्दीष्ट आहे. टप्प्याटप्प्याने त्याकडे जात आहोत. विशेष म्हणजे शेती शिवारासाठी रात्रीसाठी सिंगल फेज जोडणार आहोत. त्यामुळे जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यास मदत होईल, असे आमदार भदाणे यांनी सांगितले.
यावेळी म्हाडाचे माजी सभापती शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. टी.एन. अहिरे यांनी सुत्रसंचलन करून आभार मानलेत.