Jaykumar Rawal on Loan Waiver Dhule
धुळे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातील ९ हजार २० शेतकऱ्यांच्या खात्यावर ८९ कोटी ७४ लाख ५१ हजार ९५५ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ देण्यात येणार असून, त्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राघवेंद्र पाटील, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पोलिस दलाच्या पथकाने मानवंदना दिली.
पालकमंत्री रावल म्हणाले, यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असून खरीप हंगामात ३ लाख ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. जलाशयांमध्येही समाधानकारक जलसाठा असून पाण्याची बचत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी यंदा ३१ हजार ९२८ शेतकऱ्यांना ४४८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, प्रकल्पामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना रावल यांनी नवीन बोरविहीर-नरडाणा रेल्वेमार्ग, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग, अक्कलपाडा प्रकल्पाच्या भूसंपादनाची माहिती दिली. जिल्हा वार्षिक गुंतवणूक परिषदेत ८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे सामंजस्य करार झाले असून, त्यातून सुमारे साडेतेरा हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानातून जिल्ह्यातील ५७ हजार ७३० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी यंदा जिल्ह्यात २१ लाख ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, केवळ लागवड न करता वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.