आमदार अनुप अग्रवाल  (Pudhari Photo)
धुळे

Dhule News | विशिष्ट समाजकंटकांकडून धुळ्याला दंगलीच्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न: आमदार अनुप अग्रवाल यांचा विधिमंडळात आरोप

Anup Agrawal | धुळे शहरातील विविध भागांत काही महिन्यांपासून विशिष्ट घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू अससल्याचा आरोप आमदार अनुप अग्रवाल यांनी केला आहे

पुढारी वृत्तसेवा

Anup Agrawal on  Dhule Riot Attempt

धुळे: धुळे शहरातील विविध भागांत काही महिन्यांपासून विशिष्ट घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडून दंगल घडेल, यासाठी चिथावणीचे प्रकार सुरू झाले आहेत. काही महिन्यांपासून हिंदू नागरिकांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांनी साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. या प्रकारांमुळे शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे. अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची गरज असताना काहीच ठोस कारवाई होत नसल्याने समाजकंटक मोकाट आहेत. राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करत पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करत आज (दि.७) आमदार अनुप अग्रवाल यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.

महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात आज `पॉइंट ऑफ इन्फर्मेशन’द्वारे आमदार अग्रवाल यांनी शहरात समाजकंटकांकडून काही महिन्यांपासून होत असलेल्या चिथावणीखोर प्रकारांना पायबंद घालण्याबाबतचा प्रश्न मांडला.

धुळे शहरात गेल्या ३० एप्रिलला वक्फ कायद्याला विरोध करताना विनापरवानगी शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार घडला. याच वेळी काही जिहादी मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी हिंदू बहुल भागांतील मंदिरांसह रहिवास भागाला लक्ष्य करत दगडफेक केली. या प्रकरणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हाही दाखल केला. मात्र, समाजकंटकांवर अद्याप कुठलीच कारवाई झालेली नाही. गेल्या २१ मे रोजी ख्रिश्चन मिशनरी युवतींकडून भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात जाऊन गोरगरीब रुग्णांना तसेच रहिवास भागातील नागरिकांना बायबल ग्रंथ आपल्या छातीवर ठेवला, तर आपले सारे असाध्य आजार बरे होतील, असे सांगत धर्मांतराचा प्रयत्न झाला.

मारहाणीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. याबाबत पोलिसांकडून कुठलीच ठोस कारवाई केली जात नाही. झालीच तर थातूर-मातूर कारवाई करून संशयितांना लगेच जामिनावर सोडून दिले जाते. शहरातील देवपूरमधील एका पान दुकानावर गेलेल्या हिंदू युवकांशी किरकोळ कारणावरून वाद घालत तेथे जमलेल्या जमावाने बेदम मारहाण केली. यानंतर परिसरातील हिंदूबहुल भागात जमावाने दगडफेक करत सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रकार केला.

पाचकंदील परिसरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे शहरातील सामाजिक सौहार्द बिघडत आहे. शहरात केव्हाही दंगल भडकू शकते. आधीच धुळे शहरात तीन वेळा झालेल्या जातीय दंगलींमुळे धुळेकर नागरिक होरपळून निघाले आहेत. यामध्ये शहराची बदनामी तर होतेच शिवाय शहराच्या विकासालाही खीळ बसते. या प्रकरणी शासनाने जिल्हा पोलिस प्रशासनाला असल्या प्रकारांची वेळीच दखल घेत संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आमदार अग्रवाल यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT