इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : गोवंश जनावरांची चोरी करून कत्तलीसाठी वाहतूक करणार्या मुंबई येथील टोळीतील एका संशयिताच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवर्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल पवार व पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.
या गुन्ह्यातील आरोपी मोहंमद समीर नजीम शेख (27, रा.अमृतनगर, मुंब्रा, ठाणे) याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन स्विफ्ट डिझायर कारही (क्र. एमएच 02, सीआर 3016) जप्त करण्यात आली.
तालुक्यातील बेलगाव कुर्हे येथील दुग्ध व्यावसायिक संदीप गेणू गुळवे यांच्या गोठ्यात बांधलेल्या 5 गायींना अज्ञात चोरट्यांनी सोडून नेत त्यांची कत्तल केल्याची संतापजनक घटना चार दिवसांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती.
वाडीवर्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पवार, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, पोलिस हवालदार संदीप हांडगे, तुषार खालकर, नीलेश मराठे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधारे मेहनत व चिकाटीने प्रयत्न करून गुन्हा उघडकीस आणला.
...त्या घटनेची उकल
गेल्या चार दिवसांपूर्वी संदीप गुळवे हे राहत्या घराशेजारी गोठ्यात पहाटे गायींना चारा टाकण्यासाठी उठले असताना त्यांना गायींचे मांस, डोक्याची शिंगे व पायांचे अवशेष इतरत्र पडलेले आढळले होते. त्यांना पाहून चोरट्यांनी पळ काढला. अंगाचा थरकाप उडविणार्या व तितक्याच संतापजनक घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरविल्यानंतर त्यांना गुन्ह्याची उकल करण्यात यश आले आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस पथक पुढील तपास करीत आहे.