उत्तर महाराष्ट्र

…अशा भडकावू भाषणांना बळी पडू नका : छगन भुजबळ

गणेश सोनवणे
येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे कायम शिक्षण, विकासासाठी आपल्या सोबत आहे. काही मंडळी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू भाषण करत आहेत मात्र त्याला बळी न पडता आपण विकासाच्या, रोजगाराच्या, आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर ठाम रहायला हवे. असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले. कुणी कितीही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान आपले रक्षण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"ईद-उल-फित्र तथा रमजान ईद निमित्ताने महाराष्ट्रातून देशाला समतेचा संदेश देऊया एकोप्याने, उत्साहाने ईद साजरी करुया असे आवाहन करत मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज पठणावेळी उपस्थिती लावली.
त्यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी भुजबळ म्हणाले, देशात आपल्याला शांतता राखायची असेल आणि समतेच्या मार्गाने जायचे असेल तर सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. आपल्या मुलांना आणि मुलींना समान शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण हा आपला अधिकार आहे.  हे सांगतानाच त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत कार्य करणाऱ्या फातिमाबी शेख यांची देखील आठवण काढली. मधला काळ हा कोरोनाचा होता, अडचणींचा होता आता मात्र परिस्थिती सुधारते आहे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो, समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो अशीच प्रार्थना करूया असे भुजबळ म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT