श्रीगोंदा : संत शेख महंमद महाराज यांनी पंढरपूरच्या वार्या केल्या; पण काही मंडळी हे देवस्थान नसून दर्गा आहे असा भास निर्माण करत आहेत. या देवस्थानचे कदापि इस्लामीकरण होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
भोसले यांनी सुरुवातीला संत शेख महंमद महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी घनश्याम शेलार, गोपाळराव मोटे, पोपटराव खेतमाळीस, मीरा शिंदे, बाळासाहेब दुतारे, नंदकुमार ताडे, मीरा खेंडके, सुदाम झुंजरूक, अय्याज शेख उपस्थित होते.
भोसले महाराज म्हणाले की, शेख महंमद महाराज यांनी संत तुकाराम महाराज, बोधले महाराज यांच्याबरोबर वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी आयुष्य वेचले. मालोजीराजे भोसले यांनी संत शेख महंमद यांना जमीन दिली असे देवस्थान मुस्लिम वक्फ बोर्डाकडे जोडले आहे. यावरून या मंडळींचा हेतू किती दूषित आहे हे स्पष्ट झाले आहे.
श्रीगोंदा गाव सात दिवसांपासून संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धारासाठी आंदोलन करीत आहे. मग स्वतःला वंशज समजणारे पळून का गेले आहेत? कुठे पळून जातील अशा प्रवृत्तींना धडा शिकवावा लागेल. संत शेख महंमद महाराज देवस्थानबाबत तो वाद निर्माण झाला आहे याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आणि सात दिवसांत बैठक लावण्यास भाग पाडणार आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले.
विश्व हिंदू परिषदेचे सेवक मंगळवारी (दि. 22) सायंकाळी संत शेख महंमद महाराज मंदिरात महाआरती घेणार आहेत, असे त्यांनी या वेळी सांगितले.