जामखेड: तालुक्यातील दिघोळ-तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पावडरसदृश पदार्थाच्या सुमारे ५० ते ६० गोण्या टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा साठा गुरूवारी किंवा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येथे टाकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात सध्या अन्न भेसळीविरोधात कठोर मोहीम सुरू आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने हा दुग्धजन्य साठा येथे आणून टाकला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसून तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या गोण्यांमधील पदार्थ नेमका कोणता आहे, तो निकृष्ट, भेसळयुक्त किंवा वापरास अयोग्य आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी या पावडरचा कोणत्याही जनावरांच्या खाद्यासाठी वापर करू नये, तसेच या पदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाची वन विभाग, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबंधित पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, तसेच हा साठा येथे टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरण आणि जनावरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. खर्डा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उज्ज्वलसिंह रजपूत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून, ते लवकरच घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार असल्याचे सांगितले.