श्रीगोंदा: शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी श्रीगोंदा पोलिसांनी एक मोठी मोहीम हाती घेतली आहे. शाळेच्या परिसरात विनाकारण गाड्यांच्या फेऱ्या मारणाऱ्या, टवाळखोरी करणाऱ्या आणि शांतताभंग करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन संशयित तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रीगोंदा शहरात गेल्या काही दिवसांपासून शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळी काही टवाळखोर तरुण शाळा आणि कॉलेजच्या परिसरात दुचाकीवरून भरधाव फिरत होते. तसेच कर्णकर्कश हॉर्न वाजवून गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाकडे आल्या होत्या. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण होते आणि शैक्षणिक परिसरात शांतता बिघडत होती.
या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. बुधवारी (दि. १) सकाळी आणि दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी पोलिसांनी साध्या वेशातील महिला पोलिस आणि अंमलदारांसह शाळा परिसरात सापळा रचला. या मोहिमेदरम्यान विनाकारण शाळेच्या गेटसमोर थांबलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली. ट्रिपल सीट आणि सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या गाड्या जप्त करण्यात आल्या. हुल्लडबाजी करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले गेले.
ताब्यात घेतलेल्या तरुणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोर तरुणांचे समुपदेशन करण्यात आले. भविष्यात पुन्हा अशा प्रकारची टवाळखोरी केल्यास थेट न्यायालयामार्फत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
श्रीगोंदा शहरातील शाळा, कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. श्रीगोंदा पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे. ग्रामीण भागातील विशेषतः काष्टी, आढळगाव, घोगरगाव येथील शाळा परिसर, बस स्थानक या भागात पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
आढळगावमध्ये कारवाई अपेक्षित
आढळगाव येथील विद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यासह कर्जत तालुक्यातील भोसे, रुईगव्हाण , बिटकेवाडी या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. शाळा सुटल्यानंतर काही टारगट तरुण शाळा ते बस स्थानक परिसरात घिरट्या घालत असल्याचे दिसून येते. आढळगाव येथेही श्रीगोंदा पोलिसांकडून कारवाई अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. कोणत्याही शाळेच्या किंवा कॉलेजच्या परिसरात मुलींची छेड काढणे, विनाकारण फिरणे किंवा गोंधळ घालणे सहन केले जाणार नाही. नागरिकांना किंवा विद्यार्थ्यांना असा काही त्रास आढळल्यास त्यांनी त्वरित पोलिस नियंत्रण कक्ष किंवा '११२' या क्रमांकावर संपर्क साधावा.संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक, श्रीगोंदा