श्रीगोंदा: नगर - दौंड महामार्गावरील कोळगाव शिवारात आज(२४)पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि मारुती इको या दोन वाहनांच्या भीषण अपघातात इको गाडीतील चालकासह इतर तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. इको गाडीचा चालक नितीन कोकाटे रा. काष्टी वय २२, गजानन जनार्धन पायघन वय ४७, दुर्पा गजानन पायघन वय ३६,वैभव गजानन पायघन वय १९या अशी मय तांची नावे आहेत. करण गजानन पायघन वय १३ हा मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पायघन कुटुंबीय हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील मुळ राहणारे आहेत. कामानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे गावात राहत होते. काष्टी येथील चालक नितीन कोकाटे यांना घेऊन ते गावी गेले होते. रात्रीच (२३) ते चिंभळे येथे जाण्यासाठी ते निघाले होते. कोळगाव शिवारातील माऊली मंदिर परिसरात त्यांची गाडी आल्यानंतर दौंड हून नगरकडे जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. धडक एवढी जोराची होती की इको गाडीतील चौघांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती समजताच बेलवंडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, दादासाहेब क्षीरसागर यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकून पडलेले मृतदेह बाहेर काढले.चारही जणांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.