नगर: शिवसेना उद्धव ठाकरे सेनेने पक्षाची बैठक बोलावली आहे. कारण आमदार, खासदार पक्ष सोडून जात असल्याची माहिती त्यांना मिळाली असावी. मात्र, आता पदाधिकारी थांबण्याच्या भूमिकेत नाहीत. आता टायगर ऑपरेशन करण्याची गरज नाही ते लोक स्वइच्छेने पक्ष सोडणार आहेत. आता बैठक घेणे म्हणजे उशिरा सुचलेले शहापण आहे, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर केली.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर, कार्यकर्ते पदाधिकारी, आमदार यांच्याशी संवाद ठेवावा लागतो. पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद असला पाहिजे.
परंतु, ते इतके बिझी आहेत की, ते इंडिया आघाडीच्या बैठकीला व्हीसीवरून बोलतात. एवढे कोणत्या कामात व्यस्त आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्यावेळी आमदार, खासदार पक्ष सोडलाय लागले. त्यावेळी त्यांनी पक्षाची बैठक बोलावली. मात्र, पक्ष सोडणारांवर त्या बैठकीचा काही परिणाम होणार नाही, असे मंत्री शिरसाट म्हणाले.
..विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही
शरद पवार यांचे काही नवीन नाही. ज्यावेळी ते एस काँग्रेसमध्ये होते. तेव्हा ते सत्तेसाठी पुन्हा काँग्रेसमध्ये आले. आता त्यांनी राष्ट्रवादी काढली आणि आता पुन्हा काँग्रेसकडे जात आहेत. त्यांना विलिनीकरणाशिवाय पर्याय राहिला नाही, कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली.
उपवर्गीकरण होणार नाही
अनुसूचित जाती उपवर्गीकरणासंदर्भात विचारले असता शिरसाट म्हणाले, लोकशाहीमध्ये सर्वांना मतं मांडण्याचा अधिकार आहे. उपवर्गीकरण हा विषय काही लोक किचकट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापूर्वीही मी सांगितले होते की उपवर्गीकरण होणार नाही. बिदर समितीचा अहवाल सरकारने मंजूर केलेला नाही. आता एक लाख हरकती आल्या आहेत. त्याच्या निवड्यासाठी वेळ लागणार आहे, असेही मंत्री शिरसाट म्हणाले.