Ahilyanagar Jilha Parishad Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Jilha Parishad Election Strategy: संगमनेरमध्ये जिल्हा परिषद–पंचायत समितीसाठी ‘सिंह’ की ‘पंजा’?

पालिका विजयाच्या पार्श्वभूमीवर थोरात–तांबे यांची पुढील रणनिती काय?

पुढारी डिजिटल टीम

संगमनेर: संगमनेर नगरपालिका निवडणुकीत इंडियन फारवर्ड ब्लॉक अर्थात संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबेंनी मोठे यश संपादन केले. आता हाच प्रयोग आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये राबविला जाणार की, पुन्हा एकदा गट आणि गणात ‌‘पंजा‌’ प्रचार चिन्ह पहायला मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.

नुकतीच झालेली नगरपालिका निवडणुक काँग्रेसने पक्षाच्या पंजा चिन्हावर न लढविता इंडियन फार्वड ब्लॉक माध्यमातून ‌‘सिंह‌’ या चिन्हावर लढविली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी संगमनेर सेवा समिती स्थापन करून उमेदवार निवडणुकीला सामोरे गेले. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्याकडे नगरपालिका निवडणुकीची सूत्रे देण्यात आली होती. संगमनेर नगरपालिकेत जनतेतून नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबेसह एकूण 30 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक संगमनेर सेवा समितीचे निवडून आले. दोन अपक्षांनी बाजी मारली तर एका जागेवर शिवसेना शिंदे गटाने विजय मिळविला. माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात हे विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वाचवा काढण्यात यशस्वी झाल्याचे बोलले गेले.

पालिका निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनी ताकद लावली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनीही संगमनेरवर लक्ष केंद्रित करत सभा, रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्यांना यश आले नाही. तर भाजपाचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. नगरपालिका निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेस पक्षात संजीवनी निर्माण झाली. शहराबरोबर विशेषतः ग्रामीण भागात पालिका निवडणुकामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारात चैतन निर्माण झाले. मात्र तालुक्यात काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक इंडियन फारवर्ड ब्लॉक संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढविणार की, ‌‘पंजा‌’ चिन्हावर लढवणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी संगमनेर तालुक्यात गणा-गटात माजी मंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मेळावे सभा घेऊन जनतेत जाऊन आपली भूमिका मांडत आहे.

आमदार खताळ पराभवाचे चिंतन करणार?

आमदार अमोल खताळ पालिकेतील पराभवाचे चिंतन कधी करणार, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे आजतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांची सारी भिस्त पुन्हा एकदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच आहे. मंत्री विखेंही आमदार खताळांना या निवडणुकीत किती सामावून घेतात, हे पाहावे लागणार आहे. विखेंसाठी जिल्हा परिषदेची सत्ता महत्त्वाची असून, त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, थोरातांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

नऊ गट आणि 18 गणांमध्ये बांधणी

संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे समनापूर, तळेगाव, आश्वी बु, जोर्वे, घुलेवाडी, धांदरफळ बु, चंदनापुरी, बोटा व साकुर असे 9 गट व 18 गण आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी येथील विजय निर्णायक आहे, म्हणुनच थोरात आणि विखे पाटलांनाही येथील गट आपल्या ताब्ब्यात हवे आहेत. यापूर्वी पंचायत समितीवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची निर्विवाद सत्ता होती.

ठाकरे गटालाही सोबत घेण्याची तयारी

आगामी निवडणुकांत आमदार सत्यजित तांबे लक्ष देणार असल्याची चर्चा आहे. तर डॉ. जयश्री थोरात ह्या स्वतः जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याबाबत बोलले जाते. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेतले जाणार का, यावरही प्रश्नचिन्ह आहे. आजही ठाकरे गटाला मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे याकडेही लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT