राहुरी: राहुरी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने बुधवार (दि. २) पोलिस बंदोबस्तात शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. नवीपेठ, आडवी पेठ तसेच भागीरथीबाई शाळा रोड परिसरातील छोट्या टपरी मालकांविरुद्ध थेट कारवाई करून, रस्ते मोकळे करण्यात आले, मात्र शहरातील धनदांडग्यांच्या पक्क्या इमारतींसह मोठ्या अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करण्यास नगरपरिषद प्रशासन धजावत नसल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे.
राहुरी शहरातील जवळपास प्रत्येक प्रमुख रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. छोट्या-मोठ्या टपऱ्यांसह अनेक ठिकाणी पक्क्या इमारती व बांधकामे रस्त्यालगत अतिक्रमणाच्या कक्षेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील अनेक भागात वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. नवीपेठ, आडवी पेठ व भागीरथीबाई शाळा रोड परिसरातील काही टपऱ्या हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
दरम्यान, या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे पिंटू साळवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘शहरातील नवीपेठ, आडवी पेठ, शनी चौक, शिवाजी चौक, जुनी पेठ आदी भागात मोठ-मोठ्या इमारती अतिक्रमण कक्षेत आहेत, मात्र या पक्क्या अतिक्रमणांविरुद्ध थेट कारवाई करण्यास नगरपरिषद प्रशासन धजावत नाही.
प्रत्येकवेळी गोरगरीब टपरी चालकांविरुद्धच कारवाईचा बडगा उगारला जातो. अगोदर धनदांडग्यांचे पक्के अतिक्रमण हटवा. त्यानंतर गोरगरीबांचे अतिक्रमण काढा. मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून, केवळ छोट्या व्यावसायिकांविरुद्धच कारवाई केली जात असेल, तर ही कारवाई अन्यायकारक आहे. धनदांडग्यांचे अतिक्रमण तसेच ठेवून केवळ गोरगरीबांचे अतिक्रमण काढल्यास, नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा साळवे यांनी दिला आहे.
समान निकषाने कारवाई करा
अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत असली, तरी ही मोहीम सर्वांसाठी समान राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. छोट्या टपरी चालकांविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच पक्क्या बांधकामांविरुद्ध समान निकषाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.