राहुरी: तालुक्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे पंख देणारी मोठी घोषणा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुमारे १ हजार ६०० एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्या ठिकाणी संरक्षण क्षेत्राशी संबंधित भव्य प्रकल्प उभारण्यासाठी १० ते १५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पाच ते सात हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असून राहुरीच्या औद्योगिक इतिहासात नवे पर्व सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त रविवारी (दि. ७) नवी पेठ येथे आयोजित कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी, पुढील चार ते सहा महिन्यांत जमीन उपलब्ध झाली तर राहुरीत सर्वांत मोठा संरक्षण प्रकल्प उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट संकेत दिले.
यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ढोल-ताशांच्या गजरात आमदार तनपुरे यांची फटाक्यांच्या आतषबाजीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. सभेत बोलताना विखे पाटील यांनी राज्याच्या जलव्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. "महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढील पाच वर्षांत समुद्रात वाहून जाणारे ९० टीएमसी पाणी वळविण्याचा आमचा संकल्प आहे. त्यातील ८० टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणि १० टीएमसी पाणी मुळा धरणात आणण्याचे नियोजन सुरू आहे," असे ते म्हणाले.
मुळा धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतल्याने सुमारे ३ टीएमसी अतिरिक्त साठवण क्षमता निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारदरा-निळवंडे कालवा क्षेत्रासह मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात अतिरिक्त पाणी पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
निळवंडे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला असून कालव्यांऐवजी बंद पाइपलाइनद्वारे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिर्डी येथे सुरू होत असलेल्या संरक्षण उत्पादन प्रकल्पामुळे १,५०० युवकांना रोजगार मिळणार असून त्यासाठी ५ ते १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नेते माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्या जलसंघर्षाची आठवण करून देताना विखे पाटील म्हणाले, "पाणी आणि रोजगार हीच विकासाची खरी गुरुकिल्ली आहे. याच दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे." वांबोरी चारीसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात असून त्यामुळे दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपयांचा वीज खर्च वाचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाच्या प्रश्नावरही त्यांनी भूमिका मांडली. आवश्यक वाटल्यास मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच मानोरी बंधाऱ्याचे रूपांतर आधुनिक व्हेंटेड संरचनेत करण्यासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. नदीपात्रातील अवैध वाळू उपसा खपवून घेतला जाणार नसून जलसंपदा विभागामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी विखे आणि तनपुरे कुटुंबीयांच्या राजकीय सहकार्याचा उल्लेख करताना "राहुरीच्या विकासासाठी हे नाते अधिक बळकट होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. डॉ. तनपुरे साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगत त्यांनी नगरपालिकेची भविष्यातील निवडणूकही सर्वसंमतीने पार पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. "राजकारणातील विविध टप्प्यांमध्ये मला अनेक अनुभव मिळाले. ज्या प्रेमाने लोकांनी आजवर साथ दिली, तेच प्रेम नव्या प्रवासातही कायम राहील," अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.