एकरूखे: गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या करण्यासाठी राज्यभरातून लोक राहाता येथे येत असल्याची शरमेची बाब आहे. हे प्रकार संतापजनक असल्याचे सांगत या प्रकरणातील संबंधित डॉक्टर व केंद्रांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेऊन केली.
यावेळी डॉ. पिपाडा यांनी राहाता तालुक्यात काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकारामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात असून मुलगी जन्माला येण्याआधीच तिचे अस्तित्व संपविण्याचा हा अमानुष प्रकार थांबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे राहाता शहरासह शिर्डी मतदारसंघाची बदनामी होत असून प्रशासनाने तत्काळ विशेष पथक नेमून संबंधित रुग्णालये, सोनोग्राफी केंद्रे व डॉक्टरांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. पिपाडा यांनी केली. डॉ. पिपाडा म्हणाले, समाजातील मुलींचे प्रमाण टिकविणे व स्त्री भ्रूणहत्या रोखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून अशा बेकायदेशीर कृत्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही.
समाजातील स्त्री भ्रूणहत्या व गर्भलिंग निदानासारख्या अमानुष प्रथांविरोधात कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलून अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या विषयावर पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आवश्यक ती पाठपुरावा कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागाला चौकशीचे निर्देश देऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
आ. बंब यांनीही सभागृह गाजवलं!
राज्यभर सुरू असलेल्या गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूणहत्या या प्रकरणी आमदार प्रशांत बंब यांनीही विधानसभेत बोलताना हा एक प्रकारचा जन्माला येणाऱ्या बाळाचा खून असून संबंधित डॉक्टरांवर खूनाचे गुन्हे दाखल करणे गरजेचे असल्याचे सभागृहात सांगितले.