House Pudhari
अहिल्यानगर

PM Awas Yojana Beneficiaries Delay: घरकुल योजनेत 23 हजार लाभार्थ्यांचा विलंब; काम न सुरू केल्यास रद्दची कारवाई

पहिला हप्ता मिळूनही बांधकाम न सुरू; 31 मार्चपर्यंत काम सुरू न केल्यास वसुलीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नगर: केंद्राच्या घरकुल योजनेतून घरे मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना शासनाने 15 हजारांचा पहिला हप्ता दिला आहे. मात्र वर्ष उलटले तरीही जिल्ह्यातील सुमारे 23 हजार लाभार्थ्यांनी घराची बांधकामे सुरूच केलेली नाहीत. त्यामुळे आता संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, दि. 31 मार्चअखेर घराची कामे सुरू न केल्यास त्यांची घरकुले रद्द करून शासनाने दिलेल्या 15 हजारांचीही ‌‘वसुली‌’ करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांकडून घरकुलांच्या कामांना सुरुवात होताना दिसत आहे.

‌‘प्रत्येकाला घर‌’ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यालाही 1 लाख 25 हजार घरकुले मंजूर झालेली आहेत. यापैकी सुमारे 1 लाख 18 हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला 15 हजारांचा हप्ता जमा झालेला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासन काम करत आहेत. ज्यांना जागा नाहीत, त्यांना जागा मिळवून दिल्या जात आहेत. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ हे प्रयत्नशील दिसत आहेत.

दरम्यान, पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांपैकी 68 हजार लाभार्थ्यांनी घराची कामे सुरू केली. त्यांना आता दुसरा 70 हजारांचा हप्ता वितरित केला जात आहे. तर, प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर 25 हजार लाभार्थ्यांनी घराची कामे प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी नुकतेच साहित्य खरेदी केले आहे. लवकरच त्यांच्या कामांनाही गती येताना दिसत आहेत. मात्र, 23 हजार लाभार्थ्यांनी अजूनही घरांच्या कामाला सुरुवात केलेली नाही, हे लाभार्थी प्रशासनाच्या रडारवर आहेत.

साहेब.. दीड लाखांत घर बांधून दाखवाच!

शासनाकडून घरकुलाच्या कामासाठी 1 लाख 70 हजार रुपये दिली जातात. मात्र, सिंमेट, वाळू, खडी, स्टिल, मजुरीचे दर पाहता दोन खोल्यांच्या बांधकामासाठी पाच लाखांपेक्षा जास्त खर्च येतो. 15 हजार रुपये खात्यात आले, यातून घराचे कामही सुरू करता येईल, मात्र पुढील तरतूद कशी करायची. शासनाच्या अनुदानाचाही भरवसा नाही. अर्धवट घर बांधून ठेवायचे का, असा प्रश्न ‌‘त्या‌’ 23 हजार लाभार्थ्यांच्या मनात घोंगावत असल्यास नवल वाटणार नाही. गेल्या दोन महिन्यांपासून दुसरा 70 हजारांचा टप्पा तांत्रिक अडचणींमध्ये गुंतल्याने 68 हजार लाभार्थी हवालदिल झाल्याचे दिसते आहे.

ग्रामसभेत ‌‘ती‌’ घरकुले रद्द करणार

ज्यांना 15 हजारांचा पहिला हप्ता मिळूनही घराची कामे सुरू केलेली नाहीत. त्यांची घरकुले ग्रामसभा घेऊन रद्द केली जाणार आहेत. तशा ग्रामसेवकांना सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर संबंधितांकडून शासनाच्या दिलेल्या हप्त्याची देखील वसुलीही केली जाणार आहे. त्यामुळे घरांची कामे सुरू करण्यासाठी लाभार्थ्यांकडून आर्थिक जुळवा-जुळवीला वेग आल्याचे चित्र आहे.

मंजूर घरकुले वेळेत पूर्ण करावीत, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून गावनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. ज्यांनी पहिला हप्ता मिळूनही कामे सुरू केलेली नाहीत, अशा लाभार्थ्यांशी ते संवाद साधत आहेत. तरीही लाभार्थ्यांनी 31 मार्चपर्यंत काम सुरू केले नाही, तर मात्र ग्रामसभेद्वारे त्यांची घरकुले रद्द केली जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या मंजूर घरांची कामे सुरू करावीत.
आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT