

नगर: जिल्हा परिषदेतून पाण्याचे नमुने पाठवलेला पाणी शुद्धीकरण, सनियंत्रण व टीसीएल गुणवत्ता तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील तीन गावांच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर नमुन्यांत 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन आढळून आल, तर 29 गावांचे 34 पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठवून आवश्यक सूचना केल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पाणी नमुन्यांची प्रयोगशाळेतून तपासणी केली जाते. त्याच्या अहवालानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना केल्या जातात. जानेवारीचा अहवाल मार्चमध्ये आला आहे.
ज्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरबाबत त्रुटी आढळल्या आहेत. त्या ठिकाणी तत्काळ ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच ज्या ठिकाणचे पाणी नमुने पिण्यासाठी अयोग्य आढळले आहेत, त्या ठिकाणी तत्काळ शुद्धीकरण करून पुनर्तपासणी करून घेण्यात यावी. त्यानंतर योग्य असला तरच तो पाणीलस्रोत पिण्यासाठी वापरावा, अशा सूचना डॉ. नागरगोजे यांनी दिल्या आहेत.
दूषित पाणीपुरवठ्याची गावे
अकोले: वाघापूर, भोलेवाडी, मोग्रस, लिंगदेव, सुगाव बुद्रुक, तांभोळ, धुमाळवाडी.
जामखेड: लोणी, सांगवी, तेलघंशी, डोळेवाडी.
कर्जत: शिंदे, चिंचोली रमजान.
नगर: धनगरवाडी, बुऱ्हाननगर.
पारनेर: रुईछत्रपती, पिंपळनेर.
पाथर्डी: माणिकदौंडी.
राहुरी: कोल्हार खुर्द, पिंपळगाव फुणगी, गंगापूर.
संगमनेर: डिग्रस, आश्वी खुर्द, कोळवाडे.
शेवगाव: आखातेवाडी.
श्रीगोंदा: सुरेगाव, दैवदैठणे, बेलवंडी बुद्रुक
श्रीरामपूर: शिरसगाव.