पारनेर: केंद्र व राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या पाठीशी असून वारीतील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून या क्षेत्राला अ वर्ग मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची आणि श्रीक्षेत्र पिंपळनेरला जोडणारे रस्ते काँक्रीटचे करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शुक्रवारी दिली.
पिंपळनेर येथून सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या मानाच्या नवव्या क्रमांकाच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. १०) पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. या वेळी मंत्री नाईक यांच्या हस्ते निळोबाराय पादुका व पालखी रथाचे पूजन करण्यात आले. निळोबा राय यांच्या अभंग गाथाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले.
पिंपळनेरला जोडणारे वाडेगव्हाण, राळेगणसिद्धी व शिरूर रस्ते अत्यंत दुरवस्थेत आहेत. सदर रस्ते काँक्रीटचे करावेत, अशी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली. त्यावर ही मागणी आपल्या कोट्यातून मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मंत्री नाईक यांनी दिले. तसेच पर्यटन क्षेत्रातून शिल्लक असलेली कामेही मार्गी लावली जातील आणि या क्षेत्राला 'अ' वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीचे जनक म्हणून ओळखले जाणाऱ्या आणि 'प्रति पंढरपूर' म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पिंपळनेर येथे सकाळी १० वाजता निळोबाराय महाराजांच्या राहत्या वाड्यात विधिवत पूजन झाले. त्यानंतर पालखी सोहळा संजीवन समाधी मंदिरात आणण्यात आला. दुपारी जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते संजीवनी समाधी व पालखीचे पूजन करण्यात आले.
दुपारी मोहनानंद परंदावडेकर यांचे प्रस्थान कीर्तन झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत आणि 'एकोबा तुकोबा निळोबा' नामघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी तहसीलदार गायत्री सौंदाणे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुब्रमे, जिल्हा नियोजन समिती प्रदेश अध्यक्ष संध्याताई सोनवणे, पालखी सोहळा प्रमुख गोपाळ बुवा मकाशीकर, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक सुरेश पठारे, प्रशांत गायकवाड, हभप विकासानंद मिसाळ महाराज, समाधान महाराज शर्मा आदी उपस्थित होते.