पाथर्डी: पाथर्डी आगारात पुन्हा एकदा चालकांना थेट पाथर्डी-मुंबई कामगिरीसाठी प्रशासनाकडून सक्ती केली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रातराणी फेरीसाठी आवश्यक विश्रांती, तास व किलोमीटरचे नियम न पाळता चालकांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवासी तसेच चालक-वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच चालकाला सुमारे पाहुणे चारशे किलोमीटरचा मुंबईचा कठीण प्रवास बिना विश्रांतीचा धोक्याचा झाला आहे.
गेल्या दोन वर्षांत पाथर्डी-मुंबई थेट कामगिरीदरम्यान दोन गंभीर अपघात घडले आहेत. त्यापैकी एका दुर्घटनेत सतीश वारे या चालकाचा भीमा कोरेगाव परिसरात अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर काही काळ पाथर्डी-मुंबई थेट कामगिरी बंद करून तारकपूर आगारातून बदली चालक देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली होती.
मात्र, आता पुन्हा एकदा प्रशासनाकडून थेट कामगिरीची अंमलबजावणी सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. रातराणी बससाठी चालकाची ड्युटी किती तासांची असावी, सलग किती किलोमीटर वाहन चालवावे, यासंबंधी महामंडळाचे स्पष्ट नियम आहेत. परंतु प्रत्यक्षात या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगितले जाते.
या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत असे सांगण्यात येत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, भविष्यात पुन्हा एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल कर्मचारी व प्रवासी उपस्थित करीत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने बदली चालकांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, रातराणी ड्युटीचे तास व किलोमीटरचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
गांभीर्याने निर्णय घ्यावा
दरम्यान, या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.