पाथर्डी: बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील तीन परीक्षा केंद्रांवर सात कॉपी बहाद्दरांना तहसीलदारांच्या पथकाने पकडले. दक्षता पथके नेमली असतानाही ही घटना घडल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील 13 केंद्रांवर एकूण 5064 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी गटविकास अधिकारी यांची आठ भरारी पथके, तहसीलदारांचे प्रत्येक केंद्रावर 10 जणांचे बैठे पथक, तसेच जिल्हा प्रशासनाकडून संवेदनशील दहा केंद्रांवर स्वतंत्र पथके नेमण्यात आली होती. एवढ्या कडेकोट बंदोबस्तातही सात विद्यार्थी कॉपी करताना आढळून येणे हे विशेष मानले जात आहे.
तालुक्यातील खरवंडी येथील भगवान बाबा विद्यालयात एक, कोरडगाव येथील हरिहरेश्वर विद्यालयात दोन, तर तनपूरवाडी येथील संत भगवान बाबा विद्यालयात चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना तहसीलदारांच्या पथकाने पकडले.
दरम्यान, प्रभू पिंप्री येथील परीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी बसल्याची माहिती असल्याचा फोन पुणे बोर्डाकडे करण्यात आला होता. त्यानंतर भरारी पथक व स्थानिक यंत्रणांनी केंद्रावर सखोल तपासणी केली. मात्र, तपासणीअंती कोणताही डमी विद्यार्थी आढळून आला नसल्याची माहिती केंद्र संचालक अर्जुन वारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तथापि, या संदर्भातील अधिकृत अहवाल सायंकाळपर्यंत परिरक्षकांकडे प्राप्त झाला नव्हता, अशी माहिती रामनाथ कराड यांनी दिली.
याच दरम्यान मोहटा येथील परीक्षा केंद्रावर दगडफेक झाली असून काही व्यक्ती केंद्रात शिरल्याचा खोटा फोन गटशिक्षणाधिकाऱ्यांना आला. यावर तातडीने हालचाली करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्ष पाहणीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दिली.