पारनेर: पारनेर बाजार समितीत शुक्रवारी (दि. २६) झालेल्या लिलावात देशांतर्गत चांगल्या कांद्याला मागणी वाढल्याने पहिल्या प्रतीच्या कांद्याला २९ रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समितीत शुक्रवारी १९ हजार ५६३ कांदा गोण्यांची आवक झाल्याची माहिती सचिव सुरेश आढाव यांनी दिली. चांगल्या प्रतीचा कांदा मार्केटमध्ये कमी प्रमाणात येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी पावसामुळे कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे तो कांदा शेतकरी लगेच काढणार नाही. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली असून, भाववाढ झाल्याचे बोलले जात आहे. शेताच्या बांधावर साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
समितीत एक नंबरचा कांदा २६०० ते २९००, दोन नंबरचा २१०० ते २५००, तीन नंबरचा १५०० ते २०००, चार नंबर ६०० ते १४००, गोल्टी कांदा १७०० ते २२०० अशा प्रकारचे बाजारभाव राहिले आहेत. शेतकऱ्यांनी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
भाववाढीची शक्यता
आवक घटल्याने बाजारभाव वाढले आहेत. देशांतर्गत चांगल्या कांद्याला मागणी वाढली आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास अजून बराच अवधी असल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचे उपसभापती संदीप सालके व सभापती गंगाराम बेलकर यांनी म्हटले आहे.
उच्च प्रतीच्या कांद्याला ३१०० भाव
पारनेर बाजार समितीत या हंगामातील ३१ रुपरये उच्चांकी बाजारभाव मिळाला असून, २०९ कांद्याच्या गोण्यांना ३००० ते ३१०० असा दर मिळाला आहे. हा दर अपवादात्मक असला, तरी येत्या काही दिवसांत याही पुढे दर मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.