जवळा: पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. मात्र, त्याला योग्य भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचा खर्च व कष्ट वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी येत आहे.
कुकडी डावा कालव्याच्या हजारो एकर क्षेत्रात सध्या कांदा पिकाची काढणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र, सदर कांद्यास बाजारभाव केवळ 9 ते 10 रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे हा दर शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर पूर्ण घसरविणारा ठरत आहे. उत्पादनाच्या तुलनेत पाहिले तर शेतकरी तोट्यात जात आहे. गेली चार महिने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या कांद्याने शेतकऱ्यांचा पार वांधा करून टाकला आहे. भांडवली खर्चाचे पकी जर गेलेले भांडवलही परत देत नसेल, तर कांदा कांदा पीक करावे की नाही, या निर्णयावर काही शेतकरी आले आहेत. यंदा शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
कारण कांदा हेच या परिसरातील शेतकरी वर्गाचे वार्षिक आर्थिक नियोजनाचे मुख्य पिक असून त्यात या पिकाने धोका दिला, तर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडलेली अनेक वेळा या परिसराने नव्हे तालुक्याने पाहिली आहे. गेल्या हंगामातलाचं कांदा अजूनही चाळीत काल परवापर्यंत पडून होता.
कवडीमोल भावामुळेच आणि आताही तीच परिस्थिती ओढवलेली दिसत आहे. सरकार यावर लवकर निर्णय घेणार नाही आणि जेव्हा घेईल तेव्हा शेतकऱ्यांकडे कांदा नसेल तो फायदा व्यापाऱ्यांच्या घशात सरकार घालणार, अशीच शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. परिणामी शेतकरी कर्जाच्या खाईत लोटण्याची भीती निर्माण झाली आहे.
शेतीला दिवस नेमके चांगले कधी दिवस येणार, याबाबत शेतकरी प्रश्न उपस्थित करीत आहेत. पारंपारिक शेतीपासून आता आधुनिक शेती केली तरी बाजारभाव तेच. ही खुप मोठी शोकांतिका आहे.संतोष पठारे, कांदा उत्पादक
बाजारात कांद्याची आवक वाढल्याने बाजाभाव उतरले होते. एप्रिलच्या शेवटी बाजारभावात हालचाल होण्याची शक्यता आहे.लहू रासकर, कांदा व्यापारी
सध्या कांद्याचे भाव गडगडले असल्याने कांदा ठेवावा कि विकावा, या विवंचणेत शेतकरी आहे. त्यामुळे शेतकरी पुरता कोंडीत सापडला आहे.रामराव पाटील सालके, कांदा उत्पादक