Political News: केंद्रात भाजप मित्रपक्षाचे सरकार आहे. त्यामुळे भविष्यात सर्वांगीण विकासासाठी राज्यातही महायुतीचे सरकार येणे महत्त्वाचे आहे. राज्याचा विकास साधण्यासाठी फेक निगेटिव्हला बळी न पडता माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्यासारख्या हुशार पैलवानासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन लोकनेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी केले.
राहुरी- नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ शिराळ चिचोंडी येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, आ. मोनिका राजळे, श्रीगोंद्यातील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते, विठ्ठलराव लंघे व जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगराध्यक्ष सत्यजित कदम, धनराज गाडे, अक्षय कर्डिले, राजू शेटे, सुरेश बानकर, अशोक सावंत, मृत्युंजय गर्जे, दिलीप जठार आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या की, उमेदवार माजी मंत्री शिवाजी कर्डिले आमच्यासाठी लकी आहेत. ते यंदा शंभर टक्के निवडून येणार असून, सरकारही आपलेच असणार आहे. विखे पाटील यांची मोठी ताकद पक्षासाठी सक्रिय असून, विरोधक संविधान, जातीयवादावर अफवा पसरवत असून, या गोष्टीवर विश्वास न ठेवता विकासकामाला मतदान करा, असे आवाहन मुंडे यांनी केले.
कर्डिले म्हणाले की, निष्क्रियता झाकण्याचे काम विरोधी उमेदवार करत आहेत. आमदार नसतानाही मतदारसंघात विकासकामे केली. त्यामुळे विजयाची खात्री असल्याचा विश्वास व्यक्त करत कर्डिले यांनी आ. तनपुरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
माजी खा. डॉ. विखे म्हणाले की, उगाच एखाद्या व्यक्तीवर बोलून त्याचे महत्त्व वाढवण्याची गरज नाही. कामाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे 23 नोव्हेंबरला कामातून बोलू. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनतेच्या सेवेसाठी सक्रिय होणार असल्याचे संकेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी या वेळी देताच उपस्थितांनीही जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
राहुरी शहरातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
विजय वाघ, बेबी शिंदे, सुनीता गुंजाळ, पूजा गुंजाळ, काजल शिंदे, विमल गुंजाळ, अश्विनी वाघमारे, कौशल्याबाई शिंदे मनीषा वाघ, मनीषा भांड, कल्पना धोत्रे, सुवर्णा खंडागळे, नंदा खंडागळे, नीता जोगदंड, गुड्डी जगधने, मंगल फुलारे, अनिता गायकवाड, पुष्पा गायकवाड, हौसाबाई हिरे, नीता अरणे, सुवर्णा खंडागळे, गुड्डी पाखरे, रत्नाबाई उबदे आदींनी कर्डिले यांच्या उपस्थितीत राहुरीत प्रवेश केला.
राहुरी कारखाना पुन्हा सुरू करू - कर्डिले
तनपुरे कुटुंबियांनी सत्तेच्या माध्यमातून सहकारी संस्था बंद पाडण्याचे काम केल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. आता राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठीची जबाबदारी सत्यजित कदम यांच्यावर देतो. त्यांना जी काही मदत लागेल ते केली जाईल, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील वावरथ, जांभळी, जांबुळबन, शेरी चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, दरडगावथडी, गाडकवाडी, ताहराबाद, बेलकरवाडी, वाबळेवाडी, वरशिंदे दौर्यावर दिलेे.