अकोले : आदिवासी भागात पारंपरिक भात शेतीला फाटा देत नगदी पीक म्हणून ओळखले जाणारी स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केली आहे. भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या रंधा या परिसरात वरई, नाचणी, भाताच्या शेतात रासायनिक खतांचा, औषधांचा वापर न करता सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून नैसर्गिक पद्धतीने स्ट्रॉबेरी हे नगदी पीक युवा प्रयोगशील शेतकरी पांडुरंग भोईर यांनी घेतली आहे.
रंधा येथील पांडुरंग भोईर या युवा प्रयोगशील शेतकऱ्याने डोंगर उतारावरील नागली, वरई, भाताच्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सात गुंठे एवढ्या कमी क्षेत्रात ए.एस.के. फाऊंडेशनचे सिद्धार्थ अय्यर (सहाय्यक उपाध्यक्ष व प्रमुख), अरुण बांबळे (प्रकल्प व्यवस्थापक), बायफचे सुधीर वागळे (संयुक्त प्रादेशिक संचालक), प्रदीप खोसे (मुख्य कार्यक्रम व्यवस्थापक) प्रकल्प प्रमुख विष्णु चोखंडे, प्रकल्प समन्वयक राम कोतवाल, निलेश आलवने, मच्छिंद्र मुंढे, काजल देशमुख, मारुती सगभोर, वर्षा भागडे यांचे मार्गदर्शनाखाली प्रयोग केला.
वाई येथील नर्सरीमधून विंटर डाऊन जातीची अडीच हजार रोपे प्रतिरोप 15 रुपये प्रमाणे विकत आणले. लावणी करण्याआधी जमिनीची खोल नांगरणी व कुळवणी करून घेतली. गादी वाफ्यांवर दोन रोपांमधील अंतर 45 सेंमी, तर दोन ओळींमधील अंतर 60 सेंमी ठेवून रोपांची लागण केली. शेणखत,जीवामृत, लेंडी खतांचा वापर केला. ठिबक सिंचनाद्वारे रोपांचे पाण्याचे व्यवस्थापन केले. वडील व पत्नी यांच्या सहकार्याने स्टॉबेरीची शेती यशस्वी केल्याचे पांडुरंग भोईर सांगतात.
वाकी, रंधा खुर्द, रंधा बुद्रुक, गुहिरे, भंडारदरा, पांजरे, बारी, जहागिरदारवाडी, पेंडशेत परिसरात 57 शेतकऱ्यांना स्टॉबेरीचे रोपे व मल्चिंग पेपर देण्यात आले असून, संबंधित शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवड केली आहे.राम कोतवाल, प्रकल्प समन्वयक, राजूर
भात काढल्यानंतर दिवाळी झाल्यावर स्टॉबेरीची लागवड करण्यात आली. भातपिकाचे उत्पन्न कमी आणि स्टॉबेरीचे उत्पन्न जास्त मिळत असते. ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून मल्चिंग पेपरचा वापर केल्याने फायदा होतोय.पाडुरंग भोईर, रंधा, प्रयोगशील शेतकरी