Ahilyanagar Nivruttinath Palkhi Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Nivruttinath Palkhi: निवृत्तीनाथांची पालखी अहिल्यानगरीत दाखल; विठ्ठलनामाने दुमदुमले शहर, ५० हजार वारकऱ्यांच्या आगमनाने भक्तिमय वातावरण

आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे यांचा दिंडीत सहभाग; दोन दिवस मुक्काम, आज ज्ञानेश्वरी दिंडीच्या आगमनाने भक्तीचा उत्सव रंगणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: खांद्यावर भगवी पताका...टाळ मृदुगांच्या गजर... मुखी हरिनामाचा जयघोष अन्‌ विठ्ठलभेटीची ओढी... अशा भक्तीभावात पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची पावले आज शनिवारी अहिल्यानगरीत स्थिरावली. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखीने अवघी अहिल्यानगरी दुमदुमली. आमदार संग्राम जगताप यांनी दिंडीचे स्वागत करत वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीचा आनंद लुटला.

‘जय हरी विठ्ठल... श्री हरी विठ्ठल’, ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’ आणि ‘श्री ज्ञानदेव तुकाराम’ या नामघोषाने आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि विठ्ठलनामाच्या गजराने अवघी अहिल्यानगरी भक्तीरसात चिंब झाली. ही दिंडी दोन दिवस अहिल्यानगरीत मुक्‍कामी असून आज रविवारी नेवाशाची ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडीचेही आगमन होत असल्याने नगरकर भक्तीरसात न्हावून निघणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील महापालिकेसमोर महापौर ज्योती गाडे आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी पालखीचे स्वागत केले. २९ जूनला प्रस्थान ठेवलेल्या श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्यात जवळपास ५० हजार वारकर्‍यांचा सहभाग आहे. शुक्रवारी डोंगरगण मुक्‍कामी असलेल्या दिंडीने शनिवारी सकाळीच अहिल्‍यानगरीकडे प्रस्‍थान ठेवले. सायंकाळी ती अहिल्यानगरीत पोहचली.

आमदार संग्राम जगताप यांनी शेंडी येथे दिंडीचे स्‍वागत केले. वारकऱ्यांसमवेत पायी चालत त्यांनी भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. महापौर ज्‍योती गाडे यांनीही दिंडीत सहभागी होत पायी चालत दिंडी सोहळ्याचा आनंद लुटला.

सायंकाळी पालखी दिंडी महापालिकेजवळ येताच महापौर गाडे, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांनी दिंडीचे स्वागत करत पादुकांचे दर्शन घेतले. बीटीआर गेट येथील लष्करी जवानांनी दिंडीचे स्वागत करून वारकर्‍यांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला . वारकर्‍यांसाठी त्‍यांनी नाश्ता, चहा, पाणी आदींची व्यवस्था केली होती.

श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखी अहिल्‍यानगरातील मार्केट यार्ड येथे मुक्‍कामी थांबली. या पालखीचा शहरात दोन दिवस मुक्‍काम असणार आहे. यावेळी जिल्‍हा हमाल पंचायतीच्‍या वतीने भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी पालखीबरोबरच इतर काहीदिंड्यांचा देखील शहरात मुक्‍काम आहे. त्‍यामुळे शहर विठ्ठलनामाने दुमदुमणार आहे.

महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, शेकडो वर्षांची पालखी-दिंडी परंपरा टाळ-मृदुंगाच्या गजरात संपूर्ण राज्याला भक्तिरसात रंगविते. आपल्याला लाभलेला हा समृद्ध आध्यात्मिक वारसा अखंडपणे पुढे नेण्यासाठी युवकांनी सोहळ्यांत सहभागी व्हावे.
संग्राम जगताप, आमदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT