संगमनेर: निळवंडे डाव्या कालव्यातून कासारे येथील पाझर तलावात पाणी सोडल्याने अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या या भागात यंदा पाणी पोहचले. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी हे पाणी ‘संजीवनी’ ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले. या पाण्यामुळे लाभक्षेत्रातील 178 हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे.
संगमनेर तालुक्यातील लोहारे कासारे येथील पाझर तलावातून रविवारी (दि.22) जलपूजन करून पाझर तलावातून शेतीच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रीतम शेवाळे, कार्यकारी अभियंता अमोल कवडे, दिलीप पोकळे, अण्णासाहेब सोमवंशी, दत्तू पोकळे, विजय पोकळे, नवनाथ कानकाटे, रमेश कानकाटे, घनश्याम भास्कर, दीपक कदम, बाळासाहेब पोकळे, शिवाजी पोकळे, विजय पोकळे, दिलीप पोकळे उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, लोहारे कसारे मेंढवन हा परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहावे लागायचे. अनेकदा तलाव कोरडेच राहील्याने पिकांचे नुकसान व्हायचे. लोहारे-कासारे शिवारातील काथ नदीवर लघु पाट बंधारे विभागामार्फत सन 1966 मध्ये या पाझर तलावाची उभारणी करण्यात आली होती. या तलावाची साठवण क्षमता 43.28 दशलक्ष घनफूट इतकी आहे. परंतु यंदा तलावात 29.030 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यामुळे लोहारे, कासारे आणि मेंढवन या गावांतील सुमारे 178 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यावेळी वाल्मीक पोकळे, गोरख पोकळे, शुभम पोकळे, सुधीर पोकळे, विजय दिघे, मोहन पोकळे, चंदू कारले, सागर कारले, दिलीप गायकवाड, नाना कारले, बाळासाहेब कारले, यमनाथ कारले, रघु कारले आदी उपस्थित होते.