पारनेर-जवळा: तालुक्यातील निघोज येथे राज्य सरकार व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दारूबंदी कायम करण्याचा निर्णय दिल्यानंतर येथील दारूबंदी समितीचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत.
निघोज येथील परवानाधारक दारू दुकाने कायमची बंद झाली असली, तरी इतर अवैध मार्गाने गावठी दारूविक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या दारूविक्रीला आळा घालण्याकरिता येथील महिला व कार्यकर्त्यांनी गावात प्रचार फेरी काढली होती.
येथील दारूबंदी समितीने प्रशासनाला गावात कायमची व दारूबंदी करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच येथे चोख दारूबंदी व्हावी याकरिता राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाने सहकार्य करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली होती. या प्रचारफेरीच्या करिता गावात एक गाढव आणले होते. या गाढवाच्या पाठीवर आणि कपाळावर दारूबंदीचा संदेश देणारी सजावट करून दारूबंदीचे आवाहन या वेळी करण्यात आले. प्रचार फेरीवेळी वाद्याच्या गजरात व घोषणा देऊन या वेळी दारूबंदीचे आवाहन करण्यात आले.
गावात कुणी दारू विक्री करताना किंवा पिऊन सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास प्रथम त्याला पकडून थेट गाढवावरून धिंड काढण्यात येईल व नंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, असा इशाराही येथील महिला व कार्यकर्त्यांनी दारूविक्रेत्यांसह पिणाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रेते व दारू पिणारे यांच्यात खळबळ उडाली आहे.
यापुढे या दारूबंदी चळवळीच्या उपक्रमाचे पुढे काय परिणाम होतात हे पाहण्याची उत्सुकता आता परीसरातील लोकांना लागली आहे. यावेळी दारूबंदी समितीच्या अध्यक्षा कांता लंके, मनीषा राऊत, विमल गोरे, शालन कवाद, भानुदास साळवे, शिवाजी भुकन, तुकाराम तनपुरे, सोमनाथ वरखडे यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.