संगमनेर: मुंबई-नाशिक- पुणे हा ‘गोल्डन ट्रँगल’ आहे. नाशिक- पुणे सरळ रेल्वेमार्गाकरता सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्वकाम पूर्ण होऊन भूसंपादनाची सुमारे ५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकर्यांना देण्यात आली, आता मात्र वेगळीच कारणे सांगितली जात आहेत. रेल्वेमंत्र्यांनी यामार्गाबाबत केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे.
या विभागाच्या विकासाकरीता नाशिक- पुणे रेल्वे सरळ मार्ग नेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. दरम्यान, भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारणविरहित सर्वांना सरळ रेल्वे मार्गासाठीचं आग्रह धरावा लागणार आहे, असे ते म्हणाले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, नाशिक- पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना, थोरात म्हणाले की, नाशिक- पुणे रेल्वेमार्गाबाबत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासह महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.
मुंबई- नाशिक पुणे हा ‘गोल्डन ट्रँगल’ आहे. विकासाच्यादृष्टीने ‘गोल्डन ट्रँगल’ संपूर्ण देशासह महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक- पुणे रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे. या मार्गाकरीता सातत्याने पाठपुरावा केला. त्यादृष्टीने कामही झाले.
रेल्वेसाठी जमिनी भूसंपादीत करून सुमारे 500 कोटींपेक्षाजास्त रक्कम देण्यात आली. आता मात्र जीएमआरटीसह अन्य गोष्टी सांगितल्या जातात. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जाते, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन मार्गदर्शक मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय, असे प्रश्न विचारल्यास, काहीही दाखवता येणार नाही.
म्हणून नाशिक- पुणे रेल्वे सरळ मार्गेचं गेली पाहिजे, यासाठी सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे. हा विषय केवळ आजच्या राजकारणाचा नाही, किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणापलिकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे मार्ग होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नाशिक- पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वेमार्ग व्हावा, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून, रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. शेतकर्यांना मोबदला दिला, मात्र नवीन सरकार आले आणि हा मार्ग बदलण्याचा घाट घालण्यात आला.
याप्रश्नी या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींसह जनतेला सोबत घेऊन संघर्ष समिती तयार केली आहे. लोकनेते थोरात यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी यांची तर, मी मुख्यमंत्री व विविध अधिकार्यांची भेट घेतली आहे. रेल्वेमार्ग सरळ झालाचं पाहिजे, अशी आमची मागणी आहे, मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आहे. हा निर्णय अत्यंत असंवेदनशील आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करीत आहे, असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.
‘गोल्डन ट्रँगल’ जोडणारा रेल्वे मार्ग झालाचं पाहिजे
पिढ्यान्-पिढ्यांच्या भविष्यासह या विभागाच्या समृद्धीसाठी ‘गोल्डन ट्रँगल’ जोडणारा सरळ रेल्वे मार्ग झालाचं पाहिजे. यासाठी सातत्य ठेवून, तो मंजूर करून घ्यावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
‘नाशिक- पुणे रसळ रेल्वे मार्ग रद्द करणे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला खो घालण्याचे पाप आहे.-आमदार सत्यजित तांबे, संगमनेर.
‘नाशिक- पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून, शिर्डी- अहिल्यानगरमार्गे नवीन मार्ग नेण्याबाबत झालेल्या घोषणेनंतर नाशिक, सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणगाव, खेड मंचरसह उत्तर महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नागरिक विशेषतः तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात