नगर: जिल्ह्यात बुधवारी दिवसभर सूर्य आग ओकत होता. या कडक उन्हाच्या झळांनी नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली. उन्हाच्या तीव्रतेने जिल्हाभरातील जनजीवन होरपळून गेले. जिल्ह्यात सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
जिल्हाभरात गेले दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक होती. या वाढत्या उन्हामुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. गेल्या दोन दिवसांत तापमान चाळिशीच्या आसपास होते. बुधवारी (दि.15) मात्र उष्णतेने कहरच केला. सकाळपासूनच चटके बसण्यास प्रारंभ झाला. दुपारी बारानंतर सूर्य आग ओकू लागला. दुपारी एकपासून चार वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता अधिक होती. त्यामुळे रस्ते ओस पडले. बाजारपेठा निर्मनुष्य झाल्या.
दुपारी दोन ते तीनपर्यंत अहिल्यानगर शहरातील तापमानाने चाळिशी ओलांडली होती. राहुरी व नेवासा तालुक्यांत तापमान 42 अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले. दिवसभरात घरादारांतील पंखे गरम हवा फेकत होते. अशा परिस्थितीत वीजपुरवठा गुल होत होता. त्यामुळे आबालवृद्धांची होरपळ झाली. नागरिकांनी रसवंतीगृहे, शीतपेये दुकानांचा आसरा घेतला. बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाचे चटके सुरूच होते. रात्री बारा वाजेपर्यंत उकाडा होता.
दक्षता बाळगण्याचे आवाहन
नागरिकांनी दुपारी बारा ते तीन वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उष्माघाताची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1077, 102, 104, 108 व 112 या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.