लोणी: मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयीसुविधांचा लाभ देण्याबाबत महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता महायुतीच्या निर्णयामुळे झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. यावेळी जरांगे म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांच्या प्रश्नांनाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला. असा उल्लेख करून, मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असा आवर्जून उल्लेख मनोज जरांगे पाटील यांनी केला.
न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध
मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारने नेहमीच सकारात्मक ठेवली असून, भविष्यातही सरकार समाजाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असेल. समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी काढलेल्या शासन निर्णयातील प्रत्येक योजनेचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.