श्रीगोंदा: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांचा बुधवारी (दि. १६) तालुक्यात मुक्काम असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर व तालुक्याच्या हद्दीत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
जरांगे पाटील बुधवारी रात्री शहरात दाखल होणार असून, बाजारतळ परिसर येथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना भेटण्यासाठी अहिल्यानगर, पुणे, बीड, धाराशिव जिल्ह्यातून मराठा बांधव श्रीगोंद्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस अधीक्षकांनी स्वतः पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या बंदोबस्तासाठी अपर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलीस निरीक्षक असणार आहेत.
त्याचसोबत ३५० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी आणि दंगल नियंत्रण पथकाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. श्रीगोंदा शहरात येणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी तिथेच आपली वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बाजार तळ परिसरात मराठा बांधवांकडून स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील भावडी, आढळगावमार्गे ते श्रीगोंदा शहरात प्रवेश करतील. आढळगाव येथील तरुणांनी बैठक घेऊन जरांगे पाटील यांच्या स्वागताचे नियोजन केले.
पार्किंगसाठी निश्चित केलेली ठिकाणे
पारगाव रोड - पारगाव, अहिल्यानगर कडून येणाऱ्या वाहनांसाठी, आढळगाव रोड - आढळगाव, जामखेडकडून येणाऱ्या वाहनांसाठी, घोडेगाव रोड - घोडेगाव, राशीनकडून येणाऱ्या वाहनांसाठी, काष्टी रोड - काष्टी, दौंडकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध आहे. या चारही ठिकाणी वाहने लावल्यानंतर नागरिकांना पायी बाजार तळावर येता येणार आहे.
जामखेडमध्ये स्वागताची जय्यत तयारी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने एल्गार पुकारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी अखंड मराठा समाजातर्फे रविवारी (दि. १३) नियोजन बैठक घेण्यात आली. जरांगे पाटील मंगळवारी (दि. १५) रात्री बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी थांबणार असून, बुधवारी (दि. १६) सकाळी जामखेडमार्गे मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोहा, रेडेवाडी, तसेच मोहा फाटा येथे स्वागत कमानी उभारण्यात येणार आहेत.
शहरात मार्केट कमिटी, विश्वक्रांती चौक, बीड कॉर्नर, जयहिंद चौक, खर्डा चौक, शंभुराजे कुस्ती संकुल, पंचायत समिती कार्यालयासमोर, एसटी बसस्थानक, नगर रोड, पंचदेवालय चौक तसेच पाटोदा-अरणगाव आदी ठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. विविध चौकांमध्ये स्वागत कमानी आणि फलक उभारण्यात येणार असून, अनेक मराठा बांधवांनी आंदोलकांसाठी पाणी, बिस्किटे, नाश्ता तसेच इतर आवश्यक खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी परिसरात फिरून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
‘त्या’ बॅनरची चर्चा
येत्या १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे जामखेडमार्गे जाणार असल्याने त्यांच्या स्वागताचे बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.