पोहेगाव: कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंतच्या वर्गांना तीनच शिक्षक असल्याने सोमवारी पालकांनी आपली मुलं शाळेत पाठवली नाही. मंजूर शिक्षक मिळत नाही, तो पर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला. दरम्यान, पालकांच्या आंदोलनानंतर शाळेला एका पदवीधर शिक्षकाची व्यवस्था करण्यात आली असून सप्टेंबरनंतर दुसर्या मंजूर शिक्षकाची नेमणूक केली जाणार असल्याचे आश्वासन पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे काल मंगळवारी आंदोलन मागे घेत मुलांना शाळेत पाठविले. (Ahilya Nagar Latest News)
मनेगाव जिल्हा परिषद शाळेत एक ते सातवी पर्यंतचे वर्ग असून यामध्ये एक ते पाचवीपर्यंत 81 विद्यार्थी आहे, तर सहावी व सातवीच्या वर्गात एकून 25 विद्यार्थी आहे. एक वर्षापूर्वी सहावी व सातवीला दोन शिक्षक मंजूर होते, त्यातील एक शिक्षक पदोन्नती मिळाल्याने बदलून गेले. त्यामुळे वर्गांसाठी एकच शिक्षक शिल्लक राहिले होते. मात्र नवीन बदल्यांमध्ये ते एकही शिक्षक बदलून गेल्याने या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकच शिल्लक राहिले नाही.
पालकांनी एकत्र येत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पुरवी शाळेत शिक्षक नसल्याबाबतची कल्पना पालकांनी प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांना दिली होती. काल पालकांसमवेत विस्तार अधिकारी वाकचौरे व केंद्र प्रमुख लांडे यांनी बैठक घेतली. यावेळी एक पदवीधर शिक्षक देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले होते, तर शेख यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.
हक्काचे दोन शिक्षक मिळालेच पाहिजे, या मागणीवर पालक ठाम राहिल्याने याबाबतची कोंडी कायम राहिली होती. मात्र आज सकाळी एक शिक्षक हजर झाल्याने पालकांनी आपली मुले शाळेत पाठवली.
यावेळी शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडुरंग कोल्हे, सरपंच अण्णासाहेब गांगवे, सुखलाल गांगवे, मच्छिंद्र गोर्हे, भगिरथ झिंजुर्डे, जनार्दन गोर्हे, अमोल गोर्हे, संतोष गांगवे, शहाजी झिंजुर्डे, सोमनाथ झिंजुर्डे, योगेश कालेवार, एकनाथ जाधव, मच्छिंद्र आढाव, दिलीप आढाव, हिरामण आढाव, पोपट आढाव, बाळासाहेब आढाव, प्रकाश कालेवार, संपत मोरे, विशाल माळी, दीपक कोल्हे, सागर गोधडे साईनाथ जाधव, नवनाथ जाधव, मनोज लहामगे आदी आदी उपस्थित होते.