नगर : नगरविकास विभागाने अहिल्यानगर महापालिका आणि बारा नगरपालिकांच्या प्रभागरचनेच्या कार्यक्रमात किंचित बदल केला आहे. महापालिकेची प्रारुप प्रभागरचना आता 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रसिध्द होणार असून, 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान उपलब्ध हरकतींवर सुनावणी होणार आहे. बारा नगरपालिकांची प्रारुप प्रभागरचना 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द होणार असून, हरकतींवर 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान सुनावणी होणार आहे. मात्र, महापालिकेची अंतिम प्रभागरचना पूर्वीप्रमाणेच 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत तर नगरपालिकांची 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. (Ahilyanagar News)
अहिल्यानगर महापालिकेचा कालावधी एक वर्षांपूर्वी तर संगमनेर, कोपरगाव, राहाता, शिर्डी, श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड या दहा नगरपालिकांचा कालावधी तीन वर्षापूर्वी तर श्रीगोंदा नगरपालिका व नेवासा नगरपंचायतीचा कालावधी नुकताच संपलेला आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी शासनाकडून सुरु झालीअसून, 23 जूनपासून महापालिका व बारा नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम सुरु झाला असून, नगरपालिकांची प्रारुप प्रभागरचना पूर्वीच्या कार्यक्रमानुसार त्या त्या पालिकांचे मुख्याधिकारी 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिध्द करणार होते. तसेच उपलब्ध झालेल्या हरकतींवर 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार होती. दरम्यान, नगरविकास विभागाने 14 ऑगस्ट रोजी कार्यक्रमात बदल केला आहे. त्यानुसार प्रारुप प्रभागरचना आता 18 ते 31 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रसिध्द होणार असून, 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणी होणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेची प्रारुप प्रभागरचना पूर्वीच्या कार्यक्रमानुसार 3 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2025 रोजी प्रसिध्द होणार होऊन 9 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार होती. त्यादृष्टिने महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु होती. दरम्यान, नगरविकास विभागाच्या नव्या आदेशानुसार महापालिका आयुक्त 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत प्रारुप प्रभागरचना प्रसिध्दकरुन त्यावर हरकती मागविणार आहेत. दाखल झालेल्या हरकतींवर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी पूर्ण होणार आहेत.
राज्याच्या नगरविकास विभागाने 14 ऑगस्ट रोजी प्रभागरचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. आदेशात नमूद केलेल्या कालावधीनुसारच टप्पेनिहाय कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता संबंधित अधिकार्यांनी घ्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विहित कालावधीत घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे कालबध्द कार्यक्रमात कोणत्याही प्रकारची सवलत वा सूट मिळणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.
जिल्हा परिषद 75 गट आणि चौदा पंचायत समित्यांच्या 150 गणांची प्रारुप रचना 14 जुलै रोजीच प्रसिध्द होऊन, 92 हरकतींवर सुनावणी देखील पूर्ण झालेली आहे. जिल्हाधिकारी अंतिम रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाला पाठविणार आहेत. आयोगाने मान्यता दिल्यानंतर या आठवड्यात गट व गणांची अंतिम रचना प्रसिध्द होणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.