पाथर्डी: अमावस्येच्या पर्वणी साधत तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे लाखो नाथभक्तांनी हजेरी लावत चैतन्य कानिफनाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ओम चैतन्य कानिफनाथ महाराज की जय अशा जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. माथा टेकून आणि नामस्मरण करत भक्तांनी समाधीचे दर्शन घेत अध्यात्मिक समाधान अनुभवले.अमावस्येनिमित्त राज्याच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. नाशिक, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, ठाणे यांसह विविध जिल्ह्यांतून आलेल्या भाविकांनी मढीत गर्दी केली होती. त्यामुळे मढीसह तिसगाव परिसरात काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या; मात्र, नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्थेमुळे मोठी कोंडी टळली.
नूतन मढी येथील कानिफनाथ देवस्थान समितीने यंदा विशेष नियोजन करत मायंबा रोडवरील वाहतूक यात्रा मैदान आणि कानिफनाथ बहुउद्देशीय सभागृहाकडे वळवली. त्यामुळे मढी-मायंबा मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी झाली. या नियोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. विश्वस्त, पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांनी गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी व्यवस्था केली होती. दर्शनरांगा, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आणि वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके कार्यरत होती.
अमावस्येनिमित्त मढीबरोबरच मायंबा, वृद्धेश्वर, मोहटादेवी व धामणगाव येथील धार्मिक स्थळांनाही भाविकांनी भेटी दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. या धार्मिक स्थळांवरील गर्दीचा परिणाम पाथर्डी शहरातही जाणवला. सकाळपासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने वाहतुकीची अतिरिक्त कोंडी होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष दक्षता घ्यावी लागली. भाविकांची वाहने आणि परीक्षार्थी विद्यार्थ्यांची ये-जा यामध्ये समन्वय राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने योग्य नियोजन केले.
मढी देवस्थानचे नूतन अध्यक्ष विठ्ठल मरकड, तसेच देवस्थान समितीचे पदाधिकारी व विश्वस्तांनी अमावस्या पर्वणीच्या पार्श्वभूमीवर सर्व सोयी-सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले. मढी परिसरात भक्तिभाव, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रशासन-देवस्थान समितीचा समन्वय पाहायला मिळाला.